लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम आता बहरात आला असला तरी, ऊस वाहतूक धोक्याच्या वाटेवरुन चालली आहे. बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर अशाा वाहनांमधून रात्री होणारी ऊस वाहतूक व रिफ्लेक्टर नसताना केला जाणारा प्रवास अपघाताला निमंत्रण देत आहे.
सांगली जिल्ह्यात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा १ लाख ९ हजार १५५ हेक्टर उसाचे उत्पादन आहे. साखर कारखान्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या प्रत्येक कारखाना मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक सुरू आहे. बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रक अशा वाहनांचा यासाठी वापर केला जातो. ९८ टक्के बैलगाडीला रिफ्लेक्टर नसल्याचे दिसून आले. बहुतांश ट्रॅक्टरचे रिफ्लेक्टर जुने व नावापुरते लावल्याचे दिसून येते. ट्रकचीही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना ही ऊस वाहतूक करणारी वाहने दिसत नाहीत. त्यांचा अंदाज न आल्याने दरवर्षी अपघात होतात. या अपघातात अनेकांचे जीवही जातात. त्यामुळे अशाप्रकारच्या वाहतुकीला नियमांच्या काटेकोर पालनाचे बंधन घातले पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून या ऊस वाहतुकीकडे प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे दरवर्षी अपघात वाढत आहेत.
चौकट
सांगली-इस्लामपूर रस्त्यावर घ्यावी सर्वाधिक काळजी
सांगली-इस्लामपूर या मार्गावर सर्वाधिक ऊस वाहतूक केली जाते. या मार्गावरुन वसंतदादा, सर्वोदय, हुतात्मा व राजारामबापू साखर कारखान्याला ऊस जात असतो. त्यामुळे सांगलीपासून इस्लामपूर शहरापर्यंत सर्वत्र उसाची वाहने दिसतात. हा रस्ता खराब असून, त्यात ऊस वाहतूक मोठी असल्याने तो अधिक धोकादायक बनला आहे.
चौकट
जिल्ह्यातील साखर कारखान्यांची एकूण संख्या १४
कोट
ऊस वाहतूक वाहनांच्या मालकांनी, कारखान्यांनी वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याबाबत दक्षता घ्यायला हवी. या वाहनांमुळे होणारे अपघात हे रिफ्लेक्टरअभावी होतात. त्यामुळे आम्ही वाहतूक विभागालाही अशा वाहनांचा शोध घेऊन त्यांना रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- दीक्षित गेडाम, जिल्हा पोलीस अधीक्षक
चौकट
ऊस वाहतुकीमुळे वाढताहेत अपघात
जिल्ह्यात २०१९ मध्ये एकूण ७५६ अपघात झाले असून, त्यात २९३ जणांचा मृत्यू झाला. ६६५ लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. यात ट्रक, ट्रॅक्टरचे अपघात हे ३ टक्के आहेत. यात ऊस वाहतुकीमुळे झालेल्या अपघातांचाही समावेश आहे. जिल्ह्यात अरुंद रस्त्यांची संख्याही अधिक आहे. अशा मार्गांवरुन ऊस वाहतूक होत असतानाही अपघात होत आहेत. रात्री जिल्ह्यातील १४ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी रात्री ऊस वाहतूक करणारी वाहने थांबलेली असतात. हे प्रकारही अपघाताला निमंत्रण देत आहेत.ऊस वाहतुकीमुळे वाढताहेत अपघात