ओळ : मिरजेत सुधार समिती कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी, बलवडी येथील क्रांती स्मृतिवनाचे संस्थापक संपतराव पवार, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते झाले.
----------------------------------------
मिरज : देशातील शेतकरी आंदोलन व अराजकतेचे वातावरण हे राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचे द्योतक आहे. चांगले राज्यकर्ते घडविण्यासाठीही आता जनजागृतीची गरज निर्माण झाली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. मिरजेत शहर सुधार समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन शेट्टी यांनी केले. यावेळी बलवडी येथील क्रांती स्मृतिवनचे संपतराव पवार प्रमुख पाहुणे होते.
राजू शेट्टी म्हणाले, सध्या देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरीविरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी शेतकरी शंभर दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र, याची काेणतीही काळजी राज्यकर्त्यांना नाही. शेतकऱ्यांना मान्य नाहीत असे कायदे करण्याची राज्यकर्त्यांना इतकी घाई कशासाठी आहे? हे जनतेला कळून चुकले आहे. लोकशाहीत आंदोलनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, पंतप्रधान व गृहमंत्री शेतकरी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे झाल्यास लोकशाही धोक्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
संपतराव पवार म्हणाले, शहराच्या वेगाने वाढणाऱ्या विस्तारीकरणामुळे नागरी समस्या उग्ररूप धारण करीत आहेत. यातूनच सुधार समितीसारख्या सामाजिक संघटनांचा उदय होत आहे. रोजगारासाठी शहरांकडे येणाऱ्या मजूर, कामगारांच्या लोंढ्यामुळे शहरांचे बकाल स्वरूप पाहता खेडी स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे.
समितीचे संस्थापक अॅड. ए. ए. काझी यांनी प्रास्ताविक केले. रूपाली गाडवे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, काजा ट्रेडिंगचे कुमार पी. एम., सहायक पोलीस निरीक्षक अनिल माने, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, नगरसेवक आनंदा देवमाने, संजय मेंंढे, नगरसेविका डॉ. नर्गिस सय्यद, अय्याज नायकवडी, सज्जाद भोकरे, विवेक शेटे, विलास देसाई, मिलिंद खाडीलकर, पीर काझी, मौला कुरणे, राकेश कोळेकर, शकील पीरजादे, महेंद्र गाडे, महेश चौगुले, समितीचे अध्यक्ष जावेद पटेल, बाळासाहेब पाटील, गीतांजली पाटील, मुस्तफा बुजरूक, शंकर परदेशी, संतोष माने, श्रीकांत महाजन, जहीर मुजावर उपस्थित होते.