चालू वर्षी खानापूर घाटमाथ्यावर महिनाभरापासून एखाद् दुसऱ्या दिवसाचा अपवाद वगळता वळीव पावसाने नियमित हजेरी लावली आहे. आतापर्यंत दहा-बारा दिवस पाऊस झाल्याने जून, जुलै महिन्यांसारखे वातावरण निर्माण झाले आहे.
नियमित पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामांना गती मिळाली आहे. यावर्षी खरिपाची पेरणी वेळेवर होण्याची खात्री शेतकरी वर्गास झाली आहे. सततच्या पावसामुळे जनावरांना ओला चारा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
मात्र, पावसामुळे द्राक्षबागांना फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे येणाऱ्या द्राक्ष हंगामासाठी तयार करण्यात येत असलेल्या काडीनिर्मितीत अडथळा निर्माण होत आहे. परिणामी द्राक्षबागायतदार चिंतातुर बनला आहे.