सातारा : शहरासह ११ गावांच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या कास तलावाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव अखेर मार्गी लागला आहे. वनखात्याची २.६७ हेक्टर इतकी जमीन संपादित करण्यासाठी वनखात्याच्या भोपाळ येथील केंद्रीय कार्यालयाने तत्त्वत: मंजुरी दिली असून, पावसाळ्यानंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे संकेत पालिकेने दिले आहेत.कास तलाव सध्या ०.१ टीएमसी आहे. डोंगरांच्या कुशीत असणाऱ्या कास तलावातून सातारा शहरासह ११ गावांना पाणीपुरवठा केला जातो. तो सातारा पालिकेच्या मालकीचा आहे. त्याची उंची वाढवून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी सातारा पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. राज्य शासनाच्या सुजल निर्मल जल योजनेतून ४५ कोटींचा निधी या कामासाठी मंजूर झाला आहे. यापैकी ८० टक्के रक्कम राज्य शासन देणार असून, उर्वरित २० टक्के रकमेचा निधी सातारा पालिकेला गुंतवायचा आहे. उंची वाढविल्यानंतर कास तलावाची क्षमता एक टीएमसी होणार असून, शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा दूर होणार आहे. पालिकेला संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीची रक्कम व वृक्षतोडीचा निधी वनखात्याकडे सुपूर्द करावा लागणार आहे. त्याबाबतच्या सूचना येत्या पंधरा दिवसांत पालिकेला मिळणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)
‘कास’ची उंची वाढविण्यास मंजुरी
By admin | Updated: August 28, 2014 23:03 IST