लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : गोपीचंद पडळकर आमदार व्हावेत यासाठी पायात चप्पल घालणार नाही, असा पण करणारे दत्तात्रय कटरे, नारायण पुजारी व जालिंदर क्षीरसागर, तसेच फेटा घालणार नाही, असा पण करणारे अमरसिंह देशमुख यांचा सन्मान सोहळा झरे (ता. आटपाडी) येथे पार पडला.
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे, राजेंद्रअण्णा देशमुख, ब्रम्हानंद पडळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सभापती भूमिका बेरगळ यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार होण्यासाठी पण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पडळकर यांच्याकडून चांदीची चप्पल व दुचाकी प्रदान करण्यात आली.
दत्तात्रय कटरे, नारायण पुजारी यांनी पण केल्यापासून पायात चप्पल घातली नव्हती. जालिंदर क्षीरसागर यांनी केस-दाढीचे पैसे घेतले नव्हते. सध्या क्षीरसागर हयात नाहीत. कार्यकर्त्यांनी हे ऋण फेडण्यासाठी आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी खोत म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्यावरील कार्यकर्त्यांचे प्रेम हिमालयाच्या उंचीचे आहे. गरीब कुटुंबात जन्माला आलेला हा कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तळागाळातील माणसे उंचावर नेली. सोन्यासारखी माणसे मिळाल्याने सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आमदार झाला.
मी आयुष्यात कधीच चप्पल पुजली नाही, परंतु पडळकरांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी चप्पल पुजली. कार्यकर्त्यांवर प्रेम कसे करावे, हे पडळकर यांच्याकडून शिकावे.
यावेळी अरुण बालटे, मोहन रणदिवे, जयवंत सरगर आदी उपस्थित होते.
चौकट
सध्याचे सरकार आंधळे, मुके व बहिरे
सदाभाऊ खोत म्हणाले की, सध्याचे सरकार आंधळे, मुके व बहिरे आहे. अधिवेशनात विरोधक आवाज उठवतील, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचा बाऊ सरकार करत आहे. हे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे.
फोटो ओळी :
झरे (ता. आटपाडी) येथे सन्मान सोहळ्यात माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाषण केले. व्यासपीठावर आमदार जयकुमार गोरे, राजेंद्रअण्णा देशमुख उपस्थित होते.