सांगली : ग्रामीण व शहरी भागातील वीजचोरीविरोधातील मोहीम तीव्र करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले. नादुरुस्त रोहित्र किंवा इतर तांत्रिक कारणांनी वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पुणे विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, थकबाकीमुळे महावितरण संकटात आहे. त्यामुळे थेट ग्राहकांशी संवाद साधून बिल भरण्याची विनंती करावी. बिलंबाबतच्या शंका व तक्रारींचे निवारण तात्काळ करावे. ज्या वाहिन्यांवर हानीचे प्रमाण अधिक दिसेल, त्यांची तपासणी सुरू करावी. अनधिकृत जोडण्या काढून टाकाव्यात व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. त्यासाठी भरारी पथकांसह पोलिसांचीही मदत घ्यावी.
ते म्हणाले की, बेकायदा जोडण्या हटविण्याचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे. रोहित्रांच्या क्षमतावाढीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. महावितरणकडे पुरेशा संख्येने रोहित्र उपलब्ध आहेत, त्यामुळे रब्बी हंगामाला पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा.
----------------