मिरज : आकाशात विहरणाऱ्या स्वच्छंद पक्ष्यांनाही विसावणारं घरटं हवं असतं. उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी टांगण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. मानवनिर्मित घरट्यांची पक्ष्यांसाठी उपयुक्तता किती? याबाबत पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांत मतभेद आहेत. मार्चपासून उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून पक्षीप्रेमींना घरटे देऊन पक्ष्यांना उन्हापासुन वाचवून पाणी व चाऱ्याची सोय करण्यात येत आहे. मात्र, मानवनिर्मित कृत्रिम घरटे पक्ष्यांसाठी व निसर्ग संवर्धनासाठी उपयुक्त नसल्याचा पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे.
पक्ष्यांची घरटी हा कलाकुसरीचा अत्यंत सुंदर नमुना असतो. काड्या जमवून पक्षी स्वतः कलाकुसर करून ऊन-पावसापासून रक्षण करणारं घरटं बांधतात. सांगलीतील संवेदना व अवनि फौंडेशनने पक्ष्यांसाठी घरटे हा उपक्रम सुरू केला आहे. काही संस्था घरातील १५ किलोचा तेलाचा पत्र्याचा डबा आणून देणाऱ्या इच्छुक पक्षी मित्रांना मोफत घरटे तयार करून देत आहे. मिरजेतील पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र जोशी म्हणाले, पक्ष्यांना वाचवण्याचं एक प्रतीक म्हणून सध्या पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करून ती झाडांवर, घरांवर, खांबांवर, कुंपणांवर लावण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. पक्ष्यांसाठी घरटी लावणं म्हणजे पर्यावरण संरक्षण, या समजातून व्यक्ती व संस्था हा उपक्रम राबवत आहेत. जिथे भरपूर झाडं आहेत, जुन्या, मोठ्या झाडांना ढोली, भोकं, फटी आहेत, अशा ठिकाणी घरटी लावण्याची आवश्यकता नाही. ही घरटी लावण्यापूर्वी तिथे घरट्यांचा वापर करण्याची शक्यता असलेल्या पक्ष्यांच्या जाती अस्तित्वात आहेत की नाहीत, हे पाहणे आवश्यक आहे. कृत्रिम घरटी चिमणींपेक्षा लहान आकाराच्या पक्ष्याला उपयुक्त ठरणार नाहीत. तीन पट्टेवाल्या खारींना पिलं घालण्यासाठी या घरट्यांत जागा उपलब्ध होऊन हळूहळू खारींची संख्या वाढणार आहे. या खारी पक्ष्यांची अंडीपिल्ली साफ करून त्यांच्या मुळावर येऊ शकतात.
कृत्रिम घरटी लावण्यापेक्षा आहे त्या वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धन करण्यास प्राधान्य दिलं पाहिजे.
चाैकट
महापालिकेची निर्मिती होऊन २० वर्षे उलटल्यानंतरही महापालिका क्षेत्रात अद्याप वृक्षगणना झालेली नाही. मात्र, महापालिकेच्या सुमारे २५ चौरस किलोमीटर क्षेत्रात सुमारे तीन लाख वृक्ष असल्याचा अंदाज आहे. यापैकी ७५ टक्के वृक्ष खासगी जागेत आहेत. रस्त्याकडेच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड झाली असून, सार्वजनिक जागेत चिंच, बाभळ, गुलमोहोर, रेनट्री, पिंपळ या जातीचे वृक्ष शिल्लक आहेत. या परिस्थितीत झाडे वाचवली तरी पक्ष्यांना आधार मिळणार आहे.