लाेकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव (बुद्रुक) येथील रहिवासी असलेले भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवान अमोल भारत माळी (वय ३६) यांचा साेमवारी रात्री अपघाती मृत्यू झाला.
अमोल माळी काही दिवसांपूर्वी सुटीवर गावी आले होते. ते सोमवारी दुपारी लाडेगाव (ता. खटाव, जि. सातारा) येथे दुचाकीवरून नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजता हिंगणगावकडे परतत असताना गोरेगावजवळ (ता. खटाव) त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
छत्तीसगड येथे भारतीय सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असलेल्या अमोल यांची नुकतीच पदोन्नती झाली होती; मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. हिंगणगाव बुद्रुक येथे मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतामामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.