सांगली : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यापासून १ ते १७ एप्रिलअखेर एसटीच्या ६८०० फेऱ्या रद्द झाल्यामुळे ७.७० कोटींचे उत्पन्न बुडाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा एप्रिलचा पगार कसा भागवायचा, असा प्रश्न आहे. चालक, वाहकांची संख्या तीन हजार असून त्यापैकी १२६ जणांच्या हाताला सध्या काम मिळत आहे.
जिल्ह्यात मार्चपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिल महिन्यात तर कहरच झाला आहे. एसटीकडे प्रवाशांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. फेब्रुवारीत दिवसाला ५५ ते ६० लाखांचे उत्पन्न मिळत होते. यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ७० टक्केंनी घट झाली. १० ते १७ एप्रिल या कालावधीत उत्पन्नात ९० टक्के घट झाली आहे. जिल्ह्यातील दहा आगाराला एप्रिल महिन्यातील पंधरा दिवसांत पाच ते सहा लाखच उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी दिली.
गेल्या पंधरा दिवसांत सात कोटी ७० लाखांचा फटका बसला आहे. १० आगारातील चालक आणि वाहकांची तीन हजारांपर्यंत संख्या आहे. त्यापैकी सध्या १२६ चालक व वाहकांच्याच हाताला काम मिळत आहे. उर्वरित चालक व वाहक रोज आगारात येऊन हजेरी लावून परत जात आहेत. हाताला काम नसल्यामुळे चालक व वाहकही चिंतेत आहेत.
दहा आगारांच्या आठ टक्केच फेऱ्या
आगार मंजूर फेऱ्या मंजूर किलोमीटर सुरू फेऱ्या चालू किलोमीटर
सांगली ७१ २२०९३ ११ ३०९६
मिरज ६९ २३८५७ ८ २७००
इस्लामपूर ४४ १६५३८ ३ ९००
तासगाव ४५ १४२९२ ३ ७०९
विटा ३७ १४३२७ २ ७७५
जत ५२ २०७८७ ४ १५४५
आटपाडी ३३ ११४७६ ३ १०६४
क.महांकाळ ४९ १६८१९ ३ ८०२
शिराळा ३४ ११८२५ १ ९६
पलूस २८ १०३२६ २ ३४३
एकूण ४६२ १६२३४० ४० १२०३९