सांगली : महापालिका क्षेत्रात मुबलक व शुद्ध पाणीपुरवठ्यावरून नेहमीच ओरड सुरू असते. त्यात पाईपलाईनची गळती व विविध कारणांमुळे जवळपास २५ टक्के पाणी वाया जाते. गळती व इतर दुरूस्तीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार वाढला. नव्याने पाईपलाईन टाकल्या गेल्या. पाण्याच्या टाक्या उभारल्या, पण या साऱ्याची देखभाल दुरुस्ती करणारी यंत्रणा मात्र उभी करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.
महापालिका क्षेत्रात अमृत पाणी योजनेसह विविध प्रकल्प सुरू आहेत. नव्याने १४ ते १५ पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या. कुपवाडसाठी नवीन पाणी योजनाही अस्तित्वात आली. शहरातील जलवाहिन्याही बदलण्यात आल्या. तरीही अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात पाण्याच्या गळतीचे प्रमाणही अधिक आहे. गळती काढण्याचे काम करण्यासाठीही अपुरी यंत्रणा आहे.
चौकट
लिकेजमुळे २५ टक्के पाणी वाया
महापालिकेकडून सांगली व मिरज या दोन शहरासाठी दररोज ११५ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो. या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी सांगलीत दोन, तर मिरजेत एक जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासह शहरातील ठिकठिकाणच्या गळतीद्वारे जवळपास २५ टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.
चौकट
कोट
महापालिका क्षेत्राचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे सध्याच्या यंत्रणेवर ताण पडतो. उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारावर लवकरात लवकर लिकेज काढण्याचे काम केले जाते. सध्या मानधनावरील कर्मचाऱ्याकडून कामे करून घेतली जात आहेत. तर मोठ्या पाईलपाईनचे लिकेज काढण्याचे काम खासगी एजन्सीकडे आहे. - आर. जी. रजपूत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.
चौकट
शहरातील पाणीपुरवठ्याचे वर्षाचे बजेट : ३६ कोटी ६५ लाख
पाणीपुरवठ्याचे वर्षाचे वीजबिल : १२ कोटी
पाणीपुरवठ्यासंदर्भातील एकूण कर्मचारी : २७५
फोटो ओळी :- २५ शीतल ०१ - शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील दांडेकर मार्गावर गेल्या कित्येक महिन्यापासून जलवाहिनीला गळती लागली होती. व्हाॅल्व्हमधूनच पाणी रस्त्यावर येत होते. आता महापालिकेने खड्डा खोदून दुरुस्ती हाती घेतली आहे.
२५ शीतल ०२- मिरजेतील शास्त्री चौक परिसरात महिन्याभरापासून जलवाहिनीला गळती होती. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर आता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.
२५शीतल ०३ - काळी खणजवळील महिन्याभरापासून मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. महापालिकेने जलवाहिनी दुरूस्तीसाठी खड्डा खणला आहे. पण अजून त्याची दुरूस्ती केलेली नाही. त्यामुळे पाणी वाया जात आहे.