घनशाम नवाथेसांगली : टक्केवारी आणि घोटाळ्यांनी बरबटलेल्या महापालिकेच्या कारभाराचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. अनेक घोटाळ्यांच्या फायली बंद आहेत. टक्केवारीच्या कुरणात अनेकजण चरत आहेत. लाचखोरीचे तर महापालिका स्थापनेपासून ग्रहणच लागले आहे. उपायुक्त वैभव साबळेच्या लाचखोरीनंतर महापालिकेतील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. गेल्या ११ वर्षांत महापालिकेत लाचखोरीचे १९ सापळे लावले गेले. त्यामध्ये २२ लाचखोरांवर कारवाई झाली आहे.सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची मिळून १९९८ मध्ये महापालिका स्थापन झाली. महापालिका स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणात विकास होणार असे सांगण्यात आले; परंतु आज २७ वर्षांनंतर काय विकास झाला, हे सांगणे कठीण आहे. कारण महापालिका स्थापनेपूर्वीच्या अनेक समस्या ‘जैसे थे’ आहेत. करांचे ओझे मात्र नागरिकांच्या डोक्यावर कायम आहे. महापालिकेच्या विकासातील खरे अडथळे म्हणजे येथील खाबुगिरी म्हणावी लागेल. प्रत्येक कामाला टक्केवारीचे ग्रहण लागले आहे. महापालिकेत अनेक घोटाळे गेल्या २५ वर्षांत गाजले आहेत. तरीही अनेक घोटाळेबहाद्दर मोकाट आहेत.
लाचखोरी तर महापालिकेतील अनेक विभागांत खोलवर मुरलेली आहे. शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी याने स्वतः अगर खासगी व्यक्तीमार्फत शासकीय काम करण्यासाठी किंवा न करण्यासाठी लाचेची मागणी केली तर तो गुन्हा ठरतो; परंतु महापालिकेत प्रत्येक कामासाठी शासकीय दराव्यतिरिक्त अधिकारी, कर्मचारी यांचे दर ठरले आहेत. त्याशिवाय कामाची फाइल हलत नाही. काहीजण काम होते म्हटल्यावर खुशीने पैसे देतात; परंतु अवाजवी मागणी होत असेल तर मात्र तक्रार केली जाते.महापालिकेत गेल्या ११ वर्षांत लाचखोरीचे १९ सापळे लावले गेले. त्यामध्ये २२ लाचखोरांना सापळ्यात पकडण्यात आले. लिपिकांपासून, शाखा अभियंता, आरोग्य अधिकारी ते उपायुक्तांपर्यंत लाचेच्या सापळ्यात अडकले आहेत. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ अशी म्हण आहे; परंतु महापालिकेत उलट चित्र दिसते. वेगवेगळ्या मार्गाने लाच घेतली जात आहे. लाचखोरीचे ग्रहण दूर करण्याचे आव्हान येथे कायम आहे.
महापालिकेतील लाचखोरीवर्ष - सापळे - आरोपी२०१३ - ०२ - ०२२०१४ - ०२ - ०३२०१५ - ०१ - ०१२०१६ - ०१ - ०१२०१७ - -- --२०१८ -- --२०१९ - ०४ - ०४२०२० - ०४ - ०५२०२१ - ०१ - ०१२०२२ - ०१ - ०१२०२३ - ०१ - ०१२०२४ - ०१ - ०२२०२५ - ०१ - ०१
लाचखोरीचा प्रवासमहापालिकेत मुकादम, कनिष्ठ लिपिकापासून ते उपायुक्तपदापर्यंतचे अधिकारी, कर्मचारी आजपर्यंत लाच घेताना सापडले आहेत. त्यामुळे लाचखोरांची उतरंड येथे दिसून येते. तसेच लाचखोरीच्या आरोपातून वरिष्ठ अधिकारीही सुटलेले नाहीत. मुकादम, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, शाखा अभियंता, उद्यान पर्यवेक्षक, आरोग्य अधिकारी, अग्निशमन अधिकारी, उपायुक्त असा लाचखोरीचा प्रवास कारवाईच्या निमित्ताने दिसून आला.
प्रत्यक्षात लाचेचे प्रमाण अधिकमहापालिकेत अनेक विभागात लाचखोरी सुरू आहे. ११ वर्षांत १९ सापळे लागले हे केवळ हिमनगाचे टोक म्हणावे लागेल. कारण लाचेच्या प्रकरणात देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा फायदा असेल तर तक्रारीचे धाडस कोणी करत नाही; परंतु जर लाच देणाऱ्याचे नुकसान असेल तर तक्रार होते. अनेक विभागांत काम करून घेण्यासाठी एजंट बनले आहेत.