लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राजारामबापू साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल व कारंदवाडी युनिटकडे मागील गळीत हंगामात आलेल्या उसास प्रतिटन ११० रुपयांप्रमाणे २० कोटी ४० लाख रुपये १ सप्टेंबरला उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, राजारामबापू साखर कारखान्याच्या साखराळे युनिटकडे ९ लाख ४७ हजार ९८ टन, वाटेगाव-सुरुलकडे ५ लाख २३ हजार ९५७ टन तसेच कारंदवाडीकडे ३ लाख ८३ हजार ६५३ टन असे एकूण १८ लाख ५४ हजार ७०८ टन उसाचे गाळप झाले आहे. ऊस उत्पादकांना गणपतीच्या सणासाठी पैसे उपलब्ध करून दिले आहेत. अंतिम हप्ता ऑक्टोबर महिन्यात दीपावलीआधी देण्यात येणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल चालू आहे.
पाटील म्हणाले, चारही युनिटकडील बिगरहंगाम कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. गळीत हंगाम १५ ऑक्टोबरच्या दरम्यान चालू करण्यात येणार आहे.
उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक श्रेणिक कबाडे, विराज शिंदे, दिलीप पाटील, एल. बी. माळी, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली उपस्थित होते.