सुभाष कदम - चिपळूण, उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत. वर्षानुवर्षे इकडून तिकडे भटकत राहण्यापेक्षा मातीतून मोती पिकवलेले बरे. हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन धामणंद येथील अनिकेत म्हापदी या तरुणाने अडीच एकर क्षेत्रात केळीची लागवड करुन तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. खेड तालुक्यातील पंधरागाव धामणंद परिसरात राहणारे अनिकेत म्हापदी यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी आपल्या अडीच एकर जमिनीच्या क्षेत्रात केळीची लागवड करण्याचा निर्धार केला. त्यासाठी आवश्यक ती जुळवाजुळव करून माहिती घेण्यात आली. केळीची लागवड करण्यासाठीचे तंत्रज्ञान त्यांनी कृषी अधिकाऱ्यांमार्फत घेतले. अडीच एकरमध्ये ३ हजार ५०० केळीच्या रोपांची लागवड त्यांनी केली. त्यासाठी त्यांना ८० हजार रुपये खर्च आला. शिवाय जमीन सपाटीकरण, कंपाऊंड व कामगारांची मजुरी यासाठी २ लाख रुपये खर्च आला. केळीचे पीक ११ महिन्यात येते. एका हंगामात ८ हजार ५०० किलो केळीचे उत्पन्न होते. त्यामुळे म्हापदी यांनी ५ बाय ६ फूट अंतरात केळीची लागवड केली आहे. यावर्षी पाऊस लांबल्याने त्यांना या लागवडीची चिंता लागली आहे. जीव जीव करुन त्यांनी महत्प्रयासाने हा प्रकल्प उभारला आहे. वेळीच पाऊस पडला नाही तर रोपे पिवळी पडून नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. पंधरागांव येथील म्हापदी कुटुंबीय आता पावसाच्या प्रतक्ष्ीोत आहेत. निसर्गाने तारले तरच त्यांचा हा प्रकल्प यशस्वी होणार आहे.
तरुणाने केली पंधरागावात केळीची लागवड
By admin | Updated: July 11, 2014 00:16 IST