चिपळूण : चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ रखडलेले नूतनीकरणाचे काम गेल्या आठवड्यात पुन्हा सुरु झाले आहे. हे बांधकाम निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावे तसेच ते आधुनिक गरजांचा काटेकोर तसेच काळजीपूर्वक विचार करून केले जावे, अशी मागणी ‘आम्ही चिपळूणकर’कडून करण्यात येत आहे. तसे निवेदन या लोकचळवळीतर्फे नगरपरिषदेला लवकरच सादर करण्यात येणार आहे.इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या सध्या पूर्ववत सुरु झालेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी आर्किटेक्ट प्रशांत वराडकर चिपळूणमध्ये आले होते. यावेळी आम्ही चिपळूणकरच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन त्यांच्याशी केंद्राच्या नूतनीकरण आराखाड्याविषयी सुमारे दीड तास तपशीलवार चर्चा केली. प्रशांत वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा आराखडादेखील त्यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली साकारलेला आहे.या पार्श्वभूमीवर आम्ही चिपळूणकरच्या प्रतिनिधींनी प्रशांत वराडकर यांच्याकडून या केंद्राच्या नूतनीकरणाचा आराखडा तपशीलवार समजून घेतला. सध्या या नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळालेली असून, दुसऱ्या टप्प्याच्या आराखड्याचे सादरीकरणही झालेले आहे. या दुसऱ्या टप्प्यातील आराखड्यात मुख्यत: अंतर्गत सजावटीच्या कामाचा अंतर्भाव आहे. हे केंद्र सध्याच्या व भविष्यातील गरजांचा साकल्याने विचार करून उभारले जावे, या भूमिकेतून प्रकाश योजना, ध्वनी योजना, बैठक व्यवस्था, वातानुकूलन व्यवस्था अशा अनेक तांत्रिक बाबींचा यात विचार केलेला आहे. या चर्चेच्या दरम्यान चिपळूण नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पाटील यांचे सांस्कृतिक केंद्रात आगमन झाले. यावेळी त्यांच्याशीदेखील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावित सुधारणांबाबत चिपळूण नगरपरिषदेने सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावेत, असे आवाहन आम्ही चिपळूणकरतर्फे नगरपरिषदेला करण्यात येणार आहे. या चर्चेत रमाकांत सकपाळ, राजन इंदुलकर, निशिकांत पोतदार, ऋजुता खरे, प्रताप गजमल, ओंकार भोजने, कुमारगौरव वायदंडे, सचिन कांबळे, रुपेश धाडवे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)हजारो माणसे सुमारे तीन तास एका हॉलमध्ये बसणार आहेत. त्यामुळे आतील हवा उत्तम राहणे, रसिकांना निवांतपणे आस्वाद घेता यावा, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवाय चिपळूणमधील विविध ऋतूतील वातावरणाचा विचार करता हे नाट्यगृह वातानुकुलीत असणे ही काळाची गरज आहे. आजकाल नव्याने बांधण्यात येणारी सर्व नाट्यगृह, सिनेमा गृह वातानुकुलीतच असतात. सुमारे १२०० खुर्च्यांचे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नाट्यगृह हे वातानुकुलीतच असावे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
केंद्राचे काम आधुनिक गरजानुरूप असावे
By admin | Updated: December 3, 2015 23:51 IST