रत्नागिरी : दि महाराष्ट्र स्टेट को - आॅपरेटिव्ह मार्के टींग फेडरेशन लिमिटेडकडून दरवर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. सन २०१३-१४ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या २४,४९८.४६ क्विंटल भातापैकी केवळ १०,८४९.१० क्विंटल भातावर प्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, १३,६४९.३६ क्विंटल भात अद्यापही प्रक्रियेअभावी गोदामात पडून आहे. दरवर्षी शेतकऱ्यांकडून दि महाराष्ट्र स्टेट को - आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड भात खरेदी करते. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भातावर प्रक्रिया करुन तांदूळ रास्त दर धान्य दुकानांवर विक्रीसाठी ठेवला जातो. सन २०१३-१४मध्ये शेतकऱ्यांकडून २४,४९८.४६ क्विंटल भात खरेदी करण्यात आले होते. शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १३१० अधिक २०० रूपये बोनस मिळून १५१० रुपये दराने भातखरेदी करण्यात आली. मात्र, ई - लिलाव प्रक्रिया रखडल्याने गेली दोन वर्षे भात गोदामात पडून होते. गोदामाची साठवणूक क्षमता कमी असल्याने सन २०१४-१५मध्ये भातखरेदी करण्यात आली नाही. यावर्षी (सन २०१५-१६) भातकापणी हंगाम सुरु झाला आहे. मात्र, खरेदीसाठी शासनाकडून अद्याप कोणताही अध्यादेश जारी झालेला नाही. त्यामुळे यावर्षीदेखील भाताची खरेदी होईल की नाही याबाबत साशंकताच आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही भात खरेदी न झाल्यास हे भात तसेच गोदामात रहाणार आहे. चिपळूण येथील २०२१.२०, निवळी येथील ५६०.४०, आकले येथील ४४३.६०, शिरळ १५०१.१० व खेड ४,५३० क्विंटल मिळून एकूण १०,४८९.१० क्विंटल भात देवरुख व कोल्हापूर येथे प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. १३,६४९.३६ क्विंटल भात प्रक्रियेअभावी पडून आहे. ई - लिलाव प्रक्रियेसाठी ठेकेदारांकडून प्रतिसाद लाभत नसल्यामुळे भातावरील प्रक्रिया रखडली आहे. जिल्ह्यातील तालुका खरेदी-विक्री संघाच्या १७ खरेदी विक्री संघापैकी केवळ ५ संघातील भात प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे. उर्वरित संघाच्या गोदामामध्ये अद्याप भात पडून आहे. (प्रतिनिधी) ई - लिलाव गोंधळ : गतवर्षी खरेदी नाही ई - लिलाव प्रक्रिया सुरू केल्यानंतर ही प्रक्रिया गोंधळाची ठरू लागली आहे. ई -लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेली दोन वर्षे भात गोदामात पडून होते. जिल्ह्यातील गोदामांची साठवणूक क्षमता कमी असल्याने अधिक भात खरेदी करून ठेवणे शक्य नाही. त्यामुळे गतवर्षी भात खरेदी करण्यात आलेला नाही. अद्याप भातावर प्रक्रिया न झाल्याने यावर्षीदेखील भात खरेदी थंडावण्याची भीती आहे. प्रतिसाद नाही भात खरेदीसाठी ई - लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी ठेकेदारांकडून प्रतिसाद लाभत नसल्यानेच भातावरील प्रक्रिया रखडली आहे. कोकणात भाताचे उत्पन्न अधिक प्रमाणात होते. त्यातही रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात शेतकरीवर्ग अधिक असून, त्यांच्याकडून उत्पादित होणारा भात वेळीच खरेदी करणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील गोदामांमध्ये भाताचा साठा तसाच असल्याने भात खरेदीला लगाम बसला. शिल्लक भात साठा पुढीलप्रमाणे : विभाग साठा दापोली ९५३.६० गुहागर १६५१.६० लांजा १२८.४० राजापूर ३६३.६० राजापूर ९१४.८० चिपळूण २१६१.८० केळशी १०७५.०१ रत्नागिरी ११०५.६० संगमेश्वर २५०५.६० देवरुख ९०९.९५ शिरगाव १७८०.४० एकूण ३६४९.३६
भाताला प्रक्रियेची प्रतीक्षाच
By admin | Updated: October 18, 2015 00:21 IST