वाचनाची माध्यमे बदलली असली तरी योग्य आणि सर्वांगिण वाचन केले जात नाही. उलट आता जेवढी माहिती हवी तेवढीच सोशल मीडिया अथवा डिजीटल मीडियावर बघण्याची मानसिकता मुलांमध्ये निर्माण झाली आहे. स्पर्धा परीक्षा हा आजच्या काळातील परवलीचा शब्द झाला आहे आणि त्याला सामोरे जाण्यासाठी वाचनसंस्कार गरजेचे आहेत, असे मत महाराष्ट्राचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे व्यक्त करतात. घराघरात वाचनाचे संस्कार व्हायला हवेत, मुलांना वाचायची सवय लावायला हवी, असं मतही ते प्राधान्याने मांडतात.सध्या नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा अपरिहार्य ठरू लागल्या आहेत. स्पर्धा परीक्षांचा विचार करता कोकणचा टक्का यात अल्प असा आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारीपदी कोकणातील अतिशय कमी मुले प्रशासकीय अधिकारीपदी असलेली दिसून येतात. एकंदरीत कोकणातील मुलांचा सहभाग स्पर्धा परीक्षांमध्ये फारच कमी आहे. याची कारणे काय असावीत, यासाठी कशातऱ्हेने प्रयत्न व्हायला हवेत, या अनुषंगाने रत्नागिरीच्या गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे मुख्य ग्रंथपाल म्हणून १८ वर्षांचा दीर्घ अनुभव असलेले आणि आता नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय संचालनालयाचे संचालक म्हणून नियुक्त झालेले किरण धांडोरे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला ‘संवाद’. प्रश्न : स्पर्धात्मक परीक्षा का अपरिहार्य ठरू लागल्या आहेत? उत्तर :कुठलेही प्रशासन चालवायचे म्हटले की त्यासाठी सर्व विषयांचा परिपूर्ण अभ्यास असलेला अधिकारी वर्ग असणे काळाची गरज बनली आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी स्पर्धात्मक परीक्षांमधून पुढे आलेले अधिकारी मिळणे कठीण झाले आहे. प्रशासकीय अधिकारी यांची आज अनेक पदे रिक्त आहेत.प्रश्न : कोकणातील मुले स्पर्धात्मक परीक्षांपासून दूर का रहातात? उत्तर :एकंदरीत कोकणचा ओढा हा सांस्कृतिक, कला, अभिनय, नाट्य, सिनेक्षेत्राकडे अधिक आहे. त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ही मुले मागे असली तरी या इतर क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आता यात स्पर्धा नाही? या क्षेत्रातही कोकणची मुले चमकत आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षांबाबत त्यांना तेवढा रस दिसत नाही. याउलट पश्चिम महाराष्ट्रातील मुलांचा जास्तीत जास्त ओढा हा स्पर्धा परीक्षांकडे अधिक असतो. प्रश्न : स्पर्धात्मक परीक्षांसाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?उत्तर :पहिल्यांदा मुलांमध्ये मला आयएस, आयपीएस, युपीएस अधिकारी व्हायचयं, ही प्रबळ इच्छाशक्ती हवी. त्याचबरोबर आत्मविश्वास हवा. तरच त्याची मुख्य परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वाटचाल सुरू होते. त्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहीत करून घेणे, त्या अनुषंगाने पुस्तके, संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्रे, त्यांची टिपणे, याचबरोबर मागील दोन तीन वर्षांपूर्वीच्या प्रश्नपत्रांचे स्वरूप लक्षात घेणे महत्वाचे असते. दुसरा महत्त्वाचा टप्पा असतो तो मुलाखतीचा. मुलाखतीचे तंत्र अवगत करण्यासाठी जे आधी या परिक्षेत यशस्वी झाले आहेत, त्यांचे अनुभव महत्वाचे ठरतात. तुम्ही मुलाखतीला कसे सामोरे जाता, तुमच्यातील हजरजबाबीपणा यावर तुमचे यश अवलंबून असते. या स्पर्धा परिक्षेच्या प्रवासादरम्यान इच्छाशक्तीबरोबरच सातत्य, संयम, परिश्रम हे गुण अंगी बाणवावे लागतात. प्रश्न : कोकणातील मुले या परीक्षांमध्ये कमी का पडतात? उत्तर :स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती, आत्मविश्वास याचबरोबरच सातत्य, संयम, परिश्रम याबाबत आपल्याकडील मुले कमी पडतात. त्याचबरोबर पालकांची प्रेरणा हीसुद्धा यासाठी महत्वाची आहे. यामुळे आपण ही परीक्षा पास करू ना, आपल्याला नोकरी मिळेल ना, अशा अनेक शंका या मुलांच्या मनात येत असतात. प्रश्न : यासाठी कोणते प्रयत्न व्हायला हवेत?उत्तर :सध्या अनेक ठिकाणी स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शक वर्गही घेतले जात आहेत. पूर्वी तर मुलांना स्वत:च या परीक्षेची तयारी करावी लागत असे. त्यामुळे परीक्षेची भीती मनात होती. मात्र, आता तशी परिस्थिती नाही. मी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम करत असताना आम्ही ग्रंथालयातच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळत होता. स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने त्यांना अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध होते. किमान परीक्षेला सामोरे जाण्याची मानसिकता हळूहळू तयार झाली, हे कमी नव्हे. महत्वाचे म्हणजे कुठल्याही क्षेत्रातले वाचन हे भविष्यात तारणारे असते. प्रश्न : सध्या वाचनसंस्कृती कमी होतेय का?उत्तर :नाही. वाचन संस्कृतीची माध्यमे बदलली असून, प्रिंट मीडिया ते डिजीटल इंडिया असा प्रवास सुरू झाला आहे. प्रिंट मीडियाऐवजी आता डिजिटल, आॅडिओ, सोशल मीडिया याचा वापर जास्त होऊ लागला आहे. पुस्तके हातात घेऊन वाचणे कालानुरूप अडचणीचे ठरू लागले आहे. त्याऐवजी ई - बुक्स, आॅडिओ बुक्स यासारखी माध्यमे लोकप्रिय झाली आहेत. मात्र, हेही तितकेच खरे आहे की, आवश्यक तेवढचे वाचन केले जाते. थोडक्यात सध्याचे वाचन हे ‘पिक पॉर्इंटेड’ झालंय. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कोणते वाचन करायचेय, कुठल्या विषयावर माहिती हवीय, याविषयी पूर्ण माहिती असेल तरच आपण या इतर माध्यमांचा उपयोग करू शकतो. पण ग्रंथालयात तुम्हाला ही सर्वांगिण माहिती मिळू शकते, योग्य मार्गदर्शन होते, हेही तितकेच खरे.प्रश्न : या दृष्टीने आता ग्रंथालयात बदल होणे आवश्यक वाटते का?उत्तर :अर्थातच. आता ग्रंथालयांचेही स्वरूप डिजिटल पद्धतीने करणे अपरिहार्य ठरणार आहे. याला काही कालावधी लागेल. मात्र, डिजिटलच्या युगात आता ग्रंथालयांचे पारंपरिक स्वरूप बदलण्याच्या दृष्टीनेही पावले उचलावी लागणार आहेत.प्रश्न : स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभाग वाढावा, यासाठी कोणते प्रयत्न हवेत?उत्तर :पहिल्यांदा म्हणजे मुलांमधील इच्छाशक्ती वाढवायला हवी, त्यासाठी पालकांचे प्रोत्साहन हा महत्वाचा ‘फॅक्टर’ आहे. तसं पाहिलं तर गेल्या ५ -६ वर्षात महाराष्ट्रात राहुरी, पुणे, सांगली, औरंगाबाद या ठिकाणी स्पर्धात्मक परीक्षांमधील सहभागाचा टक्का वाढतोय. एकंदरीत महाराष्ट्रात हा टक्का अधिक वाढवण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १५ - १६च्या अर्थसंकल्पीय भाषणात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी यासाठी यंत्रणा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन पाऊले टाकायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता कोकणातही तसे वातावरण आपोआप निर्माण होईल. कोकणातील मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे. फक्त त्यांच्यात आत्मविश्वास आणि परिश्रम करण्याची तयारी निर्माण व्हायला हवी. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.- शोभना कांबळे
स्पर्धात्मक परीक्षांसाठी वाचनसंस्कार हवेत!
By admin | Updated: September 22, 2015 00:12 IST