लाेकमत न्यूज नेटवर्क
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील रेवस रेडी सागरी महामार्गावरील वरवडेजवळील उंडीचा पऱ्या येथील मोरीवरील रस्ता खचला असून, गुरुवारी दुपारपासून वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आली. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अमृत पडवळ व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होऊन जेसीबीच्या साह्याने खचलेला रस्ता तात्पुरता जांभा चिरा तसेच खडी टाकून बुजवण्यात आला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामपंचायत वरवडे सरपंच विराज पारकर व सदस्य, तसेच मालगुंड गावचे सरपंच दीपक दुर्गवळी, उपसरपंच विपुल साळवी व सदस्य तसेच महसूल विभागाचे कर्मचारी मंदार यादव व सुशील दुर्गवळी उपस्थित होते. सध्या या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असून, उर्वरित डागडुजी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
या सागरी महामार्ग गणपतीपुळे-मालगुंड-वरवडे-जयगड-खंडाळा आदी महत्त्वाच्या गावांकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज प्रवास करणारे पर्यटक ग्रामस्थ तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्ण प्रवास करतात. हा प्रकार लवकर लक्षात आल्याने जीवितहानी अथवा अपघात टळला.
याठिकाणी गणपतीपुळे पोलीस चौकीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सागर गिरीगोसावी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्यावरील खचलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने बावटे लावण्यात आले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे.