रत्नागिरी : भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या विद्यमाने २२ जानेवारी २०१५ पासून मुलींच्या कल्याणासाठी सुरू झालेली ‘सुकन्या समृध्दी अकाऊंट’ नावाची नवीन अल्पबचत योजना भारतीय टपाल विभागातर्फे ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बालिकांचे सक्षमीकरण व्हावे, या हेतूने सुकन्या समृध्दी अकौंट ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत २ डिसेंबर २००३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या (जन्म तारखेपासून वयाच्या १०व्या वर्षापर्यंत) मुलींच्या नावाने हे खाते पालक उघडू शकतात. खाते उघडताना मुलीच्या जन्माचा दाखला, पालकांचा फोटो व पत्त्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. खाते उघडताना १ हजार रुपये मूल्य भरणे आवश्यक असून, त्यानंतर १०० रुपयांच्या पटीमध्ये खात्यात हप्ता भरता येईल. आर्थिक वर्षामध्ये जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपये एवढी गुंतवणूक करता करता येणार आहे. या योजनेसाठी सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी ९.१ टक्के व्याजदर इतका ठेवण्यात आला आहे. हे खाते २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच बंद करता येईल. मात्र, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ५० टक्के रक्कम काढता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला असून, सर्व टपाल कार्यालयांमध्ये ही योजना २२ जानेवारीपासून सुरु करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
टपाल विभागातर्फे ‘सुकन्या’ घरोघरी जाणार
By admin | Updated: January 29, 2015 00:13 IST