अडरे : आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन भाजीपाला पिकाचे संगोपन केल्यास कोकणच्या लाल मातीमध्ये या पिकाचे विक्रमी उत्पादन घेता येऊ शकते, असे मत मृदसंधारण संशोधन केंद्र, आवाशी (ता. खेड) येथील प्रभारी अधिकारी डॉ. वैभव शिंदे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत आठवडा बाजार प्रशिक्षण ग्रामपंचायत, खेर्डी येथे नुकतेच घेण्यात आले. यावेळी शिंदे यांनी शेतकऱ्यांना कोकणातील भाजीपाला लागवडीविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी खेर्डी, शिरगाव व मोरवणे परिसरातील शेतकरी गटाचे सभासद उपस्थित होते. पावसाळ्यानंतर कमी कालावधीत कोणती पिके घेणे शक्य आहे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.संपूर्ण कोकणपट्ट्यात येथील बहुतांश शेतकरी वर्षातून भाताचे एकच पीक घेत असतात, तर काहींच्या फळबागा आहेत. परंतु, शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता राहण्याकरिता सिंचनाची सुविधा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी भात उत्पादनांवर रब्बी व उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. या उत्पादनाची शेतकऱ्यांनी स्वत: अथवा समूह गटाच्या माध्यमातून थेट विक्री केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतोे, असे शिंदे म्हणाले. शेतीचे कोणतेही उत्पादन घेताना किंवा विक्री करताना सामुदायिक पध्दत वापरली, तर कमी श्रमात जास्त पैसे मिळतात, असेही ते म्हणाले.कृषी सहाय्यक आर. के. जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतमाल विक्री व्यवस्थेविषयी मार्गदर्शन केले. पाटील यांनी शेतकऱ्यांना महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळाजी चिले यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी मंडल कृषी अधिकारी महेंद्र धोतरे, कृषी पर्यवेक्षक शांताराम उदेग व कृषी विभागाचे कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास विक्रमी उत्पादन : शिंदे
By admin | Updated: February 2, 2015 00:14 IST