रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करणे गरजेचे आहे. महिनाभरात दुसरी लाट संपविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचा संकल्प रत्नागिरीचे नवीन जिल्हाधिकारी डाॅ. बी.एन. पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ते म्हणाले, रत्नागिरीत दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणात वाढ आणि पाॅझिटिव्हिटी कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी वाॅर रूम तयार करून चर्चा करणार. दर दिवशी कोरोनाच्या १० हजार चाचण्या करण्यावर भर देणार. यासाठी आरटीपीसीआरवर अधिक भर देणार. अत्यावश्यक असेल तेथेच ॲंटिजन करणार. सध्या आरटीपीसीआर १००० पर्यंत होतात, त्या दरदिवशी २५०० पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण आरोग्य केंद्रांत चाचण्या होणार असून दररोज याबाबतचा आढावा घेतला जाईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी दिली.
काॅन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देणार असून त्यासाठी हाय रिस्क आणि लो रिस्क असे दोन विभाग करणार, डेरवण येथील खासगी मेडिकल कॉलेजला हजार चाचण्या करते, त्यांनाही परवानगी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझे गाव कोरोनामुक्त गाव ही योजना कोरोना हाॅटस्पाॅट गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या सहकार्याने प्रभावीपणे राबविणार. रत्नागिरी जिल्ह्यातील गावे जास्तीत जास्त कोरोनामुक्तीची बक्षिसे जिंकतील, यासाठी प्रयत्न करणार. लोकांमध्ये याबाबत जागृती झाली तरच कोरोनाची दुसरी लाट कमी होईल, असे ते म्हणाले. पर्यटकांची तसेच सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्यांची सक्तीची चाचणी करण्यात येणार असल्याचे डाॅ. पाटील यांनी सांगितले.
...............
अर्थचक्र सुरू करणार...
कोरोनाकाळात उद्योग बंद राहिले आहेत. अर्थचक्र सुरू होण्याच्या दृष्टीने कोरोनाचे नियम पाळून ९२८ पैकी बंद असलेले ३०० उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न करणार. त्यासाठी मायक्रो प्लॅन बनवून दिला आहे. ८५०० पैकी ७००० कामगारांच्या चाचण्या झाल्या असून ७६०० लोकांचे लसीकरण झाले आहे.
विविध टुरिझम प्लान बनविणार...
कोकणात टुरिझम महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने कोस्टल आणि नाॅन कोस्टल असे वेगवेगळ्या प्रकारचे प्लान बनविणार. सिंधुरत्न प्रोजेक्टची अंमलबजावणी तसेच फळबाग लागवडीवर भर देणार आहे. एअरपोर्टचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी सांगितले.