राजापूर : राजापूर, हर्डी, रानतळे रस्ता पावसामुळे खचला होता. रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असून, या मार्गावरील वाहतूक लवकरच सुरू होणार आहे. रस्ता खचल्यामुळे एस. टी.सह अवजड वाहनांसाठी मार्ग बंद ठेवण्यात आला होता. मात्र, दुरुस्तीमुळे या मार्गावरील फेऱ्या लवकरच सुरू होणार असून, ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.
लेखन स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : हागणदारीमुक्त कार्यक्रम अधिक सक्रिय करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर हागणदारीमुक्त अधिक विषयावर घोषवाक्य, लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरअखेर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. स्पर्धेचा उद्देश कार्यक्रमाबाबत जाणीव जागृतीद्वारे लोकसहभाग वाढविणे आहे.
पाटणकर यांची निवड
राजापूर : तालुक्यातील पाचल ग्रामपंचायत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अफजल पाटणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच अपेक्षा मासये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत पाटणकर यांची निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच किशोर नारकर, ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोजे उपस्थित होते.