लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेले पाच-सहा दिवस पाऊस गायब असल्याने भातशेती लागवडीची कामे खोळंबली आहेत. पाण्याअभावी जमिनीला तडे गेले आहेत. लागवड केलेली रोपे पिवळी पडली आहेत. कडाक्याचा उन्हामुळे भाताची रोपे वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
तौक्ते चक्रीवादळानंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. भातपेरणीच्या कामासह नांगरणी व अन्य मशागतीची कामेही पूर्ण करून घेतली. पावसामुळे रोपांची जोमदार वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवडीच्या कामांना प्रारंभ केला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला असला तरी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होती, त्या मळेशेती, पाणथळ भागातील भात खाचरातून लागवडीची कामे उरकण्यात येत होती. मात्र, पावसाने चांगलीच विश्रांती घेतली असून कडकडीत उन्ह पडत आहे. दिवसभरात एखादी सर आली तर अन्यथा कडाक्याच्या उन्हामुळे रोपे वाळू लागली आहेत. लागवड केलेल्या क्षेत्रातील जमिनीला तडे गेले आहेत. रोपांचा रंग बदलला असून पिवळसर झाली आहेत. त्यामुळे रोपे जगण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. काही शेतकऱ्यांनी भाड्याने पंप घेऊन लागवड सुरू केली आहे. लागवड होत असली तरी पाऊस नसल्याने खर्च आणि परिश्रम वाया जात आहे. तुलनेमध्ये उत्पन्न कमी येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.