राजापूर : गेले पाच दिवस तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला असून, जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे. यामुळे व्यापारी आणि नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून तालुक्यात पावसाने संततधार धरल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला होता. पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेत शिरकाव केल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. ग्रामीण भागातील दळणवळणाची व्यवस्था कोलमडली होती. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या होत्या.
गुरुवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने व शुक्रवारी पावसाने उघडीप दिल्याने वातावरण निवळले असून, जनजीवन पूर्ववत सुरू झाले आहे. राजापूर शहर आणि तालुका परिसरातील पूरस्थिती निवळली आहे. पाच दिवस पाण्याखाली असलेला शीळ चिखलगाव मार्गावरीलही पुराचे पाणी ओसरले आहे. आता सगळीकडेच पाणी ओसरल्याने ग्रामीण भागातील एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाने नियोजन केले आहे.