प्रकाश वराडकर--रत्नागिरी --रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातली आहे, त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. २ जुलै २०१६ रोजी या पाचही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरसेवकपदांची आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे विद्यमान सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये धकधक निर्माण झाली आहे. ही आरक्षण सोडत कोणाला लाभणार व कोणाच्या उमेदवारीला खो देणार, याबाबत राजकीय वर्र्तुळात चर्चेला उधाण आले असून, सोडतीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची राजधानी असलेल्या रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. रत्नागिरी नगरपरिषदेचे याआधी २८ वॉर्ड व ७ प्रभाग होते. मात्र, आता वॉर्ड्सची फेररचना करण्यात आली आहे. त्यानुसार ३० वॉर्ड व १५ प्रभाग करण्यात आले आहेत. या फेररचनेचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असतानाही त्याबाबत नगरसेवकांना विश्वासात घेतले गेले नाही, अशी तक्रार नगरसेवकांमधून केली जात आहे. फेररचना करताना कोणता वॉर्ड तोडला व कोठे जोडला, याबाबत नगरसेवक अद्याप अंधारात आहेत. राजापूर नगरपरिषद क्षेत्रात १७ वॉर्ड असून, ९ प्रभाग आहेत. नव्याने फेररचनेत काय होणार, याबाबत राजापूरवासीयांना उत्सुकता आहे. त्याचबरोबर २ जुलै रोजी होणाऱ्या नगरसेवकपद आरक्षण सोडतीमध्ये आरक्षणे कशी पडणार, कोणाची सोय होणार व कोणाची गैरसोय होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत गेल्या वेळी मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या होत्या. चिपळूण हे राजकीय घडामोडींचे केंद्र आहे. त्यामुळे यावेळी मंजूर होणाऱ्या वॉर्ड व प्रभाग फेररचना आराखड्यात कोणाची सोय होणार व कोणाची गोची होणार, याची उत्कंठा सर्वांना आहे. चिपळूणमध्ये आधीचे २४ वॉर्ड असून, आता वॉर्डची संख्या २६ होणार आहे, तर प्रभाग संख्या १३ होणार आहे. नगरसेवकपद आरक्षण सोडतीमध्येही विद्यमान नगरसेवकांना धक्का बसणार की पुन्हा संधी मिळणार, याबाबतही चर्चा सुरू आहे. खेड नगरपरिषद गेल्यावेळी मनसेच्या ताब्यात गेली. वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे मनसेने आघाडी घेतली होती. तेथे असलेली सत्ता पुन्हा होणाऱ्या निवडणुकीत टिकवण्यात मनसेला यश येणार का, याची चर्चा सुरू असतानाच आरक्षण सोडतीवरही अनेक उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. प्रभाग फेररचनेतील बदलाची शहरवासीयांना उत्सुकता आहे. दापोली नगरपंचायत क्षेत्रात येत्या निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्यात येणार आहे. त्यानुसार फेररचनेचा आराखडा मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. २ जुलै रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. निवडणुकीपूर्वीच जोरबैठकाजिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण व खेड या नगरपरिषदा, तसेच दापोली नगरपंचायतीची निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यासाठी विद्यमान नगरसेवक, इच्छुक उमेदवार व हौशे नवशेही तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या जोरबैठका आधीच सुरू झाल्या आहेत. काही इच्छुकांनी आपल्या पक्षामार्फत उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. नगराध्यक्षपदाचे बाशिंग...!यावेळी २००० सालाप्रमाणे पुन्हा एकदा थेट नगराध्यक्ष निवड होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड या नगरपरिषदांमध्ये, तर दापोली नगरपंचायतीमध्ये अनेकजण नगराध्यक्षपदासाठी बाशिंग बांधून आहेत. असे असले तरी पक्षीय पातळीवरच थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरवले जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच नगरसेवक आरक्षण सोडतीनंतर निवडणूकपूर्व युती, आघाडी, शहर विकास आघाडी यासाठी जोरदार हालचाली सुरू होणार आहेत.
आरक्षणाची ‘धकधक’ सुरु
By admin | Updated: June 27, 2016 00:38 IST