मेहरुन नाकाडे - रत्नागिरी कला, क्रीडा नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कोकणच्या सुपूत्रांनी ठसा उमटविला आहे. नेमबाजीसारख्या स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी जागा उपलब्ध नसतानासुध्दा जिद्द व चिकाटीच्या जोरावर रत्नागिरीचे सुपूत्र विनय देसाई यांनी राज्यस्तरावर विजय संपादन करत रत्नभूमीला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. रत्नागिरी शहर रायफल क्लब स्थापित असून महाराष्ट्र रायफल असोसिएशनशी संलग्न कार्यरत आहेत. या क्लबचे २२ सदस्य आहेत. मात्र या मंडळींना आवड असतानाही स्पर्धेसाठी सराव करण्याकरीता स्वतंत्र मैदान अथवा जागा उपलब्ध होत नाही. हॉटेल व्यावसायिक असलेल्या विनय देसाई यांनी आपली आवड जपत नुकत्याच झालेल्या कॅप्टन एस. जे. इजीकल मेमोरियल महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप नोव्हायसेस स्पर्धेत (२५ मीटर प्रकारात) सुवर्णपदक मिळविले आहे. हॉटेल व्यवसायिकांची जबाबदारी सांभाळत विनय यांनी नेमबाजीची आवड जपली आहे. रत्नागिरीत हेमंत कीर, बंधू विशाल व विक्रांत देसाई यांचे त्यांना सदैव मार्गदर्शन लाभते. स्पर्धेसाठी तयारी करावयाची असेल तर सराव आवश्यक आहे. मात्र रत्नागिरीत सराव करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मुंबई गाठावी लागते. मुंबईत गेल्यानंतर अर्जून पुरस्कार विजेते शीला कानुंगे, अशोक पंडित यांचे मार्गदर्शनाखाली विनय नेमबाजीचे धडे घेतात. आॅल इंडिया जी. व्ही मावळंकर स्पर्धेत निवड झाल्यानंतर पहिल्या १० मीटर प्रकारात यश संपादन केलेल्या विनय यांची नोव्हायसेस चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली. दहा मीटर एअरफीस्टल व २५ मीटर फायरआर्म स्पर्धेत यश मिळविले. राज्य स्पर्धेतील यशानंतर देसाई यांची आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये अहमदाबाद येथे जी. व्ही. मावळंकर पूर्व राष्ट्रीय निवड स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत दहा, पंचवीस व पन्नास मीटर अशा प्रकारात देसाई खेळणार आहेत. रत्नागिरी शहर लहान असले तरी या ठिकाणी प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध नाही. येथील खेळाडूंना आपली आवड जपण्यासाठी पंधरा वीस हजार रूपये खर्च करून मुंबई, पुणे गाठावी लागते. शिवाय अन्य कामकाजाकडे दुर्लक्ष करावे लागते. राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्यापूर्वी दोन आठवडे मुंबईत राहून सराव करीत होतो, असे देसाई यांचं म्हणणे आहे. पोलिसांसाठी गोळीबार सराव करण्यासाठी फणशी येथील मैदानाचा वापर नेमबाजी सरावासाठी रत्नागिरी शहर रायफल क्लबकरीता उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व सदस्यांनी पोलिस अधिक्षक डॉ. संजय शिंदे यांची भेट घेवून निवेदन सादर केले आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून सरावासाठी स्वतंत्र मैदानाकरिता सुमारे अडीच एकर जागेसाठी मागणी करणार असल्याचे सांगितले जेणेकरून त्या मैदानात १०, २५ व ५० मीटर प्रकारात नेमबाजीचा सराव करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूंकडे स्वत:ची बंदूक असणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचा वापर सरावासाठी करण्यात येईल, कारण ज्यावेळी सरावासाठी मुंबई, पुणे येथे सरावासाठी गेल्यानंतर त्यावेळी तेथील स्पर्धक किंवा उपलब्ध शस्त्र वापरावे लागते. मात्र आधीच्या वापरलेल्या स्पर्धकांनी आपल्या सोयीसाठी बदल केलेला असतो. त्यामुळे त्या बंदूकीचा वापर करताना अवघड होते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंना बंदूकीची गरज आहे, असे विनय यांचे म्हणणे आहे.
रत्नागिरीच्या विनयचा ‘सुवर्ण’नेम
By admin | Updated: June 17, 2014 01:18 IST