रत्नागिरी : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी १२ ते २ यावेळेत संवाद साधला. या सभेत देशभरातील तीन हजार कार्यकर्त्यांचा समावेश हाेता.
या सभेत कपिल नागवेकर यांनी रत्नागिरीमधील काँग्रेसच्या परिस्थितीचा आढावा दिला. यावेळी राहुल गांधी यांना रत्नागिरीत येण्याचे निमंत्रणही कपिल नागवेकर यांनी दिले. जवाहरलाल नेहरू यांनी रत्नागिरीत येऊन सभा घेतल्याची आठवण करून देत आपणही रत्नागिरीत यावे, असे आग्रहाचे निमंत्रण दिले. या सभेत राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना तुम्ही काँग्रेस परिवाराचे सदस्य आहात, तुम्ही तुमच्या विभागात निडर बनून काम करत राहा. लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत राहा, असा संदेश दिला.
या सभेमध्ये साेशल मीडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, गुहागर तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर, मकरंद जोशी यांनी सहभागी हाेऊन संवाद साधला.