देवरूख : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या आदेशानुसार बँकांमार्फत पीक कर्ज वितरीत केले जात आहे. शेतकऱ्यांची उदासीनता, शासकीय कर्मचाऱ्यांकडून तळागाळातील शेतकऱ्यांना याची सविस्तर माहिती न मिळणे यामुळे योजनेचे काम धीम्या गतीने सुरू आहे. ७३ हजार १३९ शेतकऱ्यांपैकी केवळ २२ हजार ५४५ शेतकऱ्यांनी आजपर्यंत या योजनेचा फायदा उठवला आहे. तालुक्यात कर्ज वाटपाचे काम ३०.८२ टक्के एवढेच झाले आहे. कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकत पीक कर्ज वाटपाची योजना राबवण्याचा निर्णय घेत कामकाजाला प्रत्यक्षात प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी कोणतीही आर्थिक टंचाई भासू नये, या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे.राष्ट्रीयीकृत बँका, सोसायट्या यांच्यामार्फत पीककर्ज वाटपासाठी अर्ज वितरीत करण्यात येत आहेत. संगमेश्वर तालुक्यात ७३ हजार १३९ शेतकरी या योजनेसाठी योग्य आहेत. यातील २२ हजार ५४५ शेतकऱ्यांनी परिपूर्ण अर्ज लिहून सादर केले आहेत. या योजनेचे ३०.८२ टक्के कामपूर्ण झाले आहे. संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून, ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. येथील ग्रामस्थांचा शेती हा व्यवसाय आहे. पीककर्ज वाटप योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड ग्रामीण भागातून होत आहे. शेतकऱ्यांमध्ये कर्जापोटी असलेली भीती मुख्य कारण आहे. याचसाठी शेतकरी कर्ज घेण्यासाठी धजावत नाहीत. तालुक्यातील पीक कर्ज घेण्यास योग्य असलेले सुमारे ५० हजार शेतकरी वंचित आहेत. पीक कर्ज योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वैशाली माने यांनी केले आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची पाठ : जनजागृतीच नाही...शासकीय कर्मचाऱ्यांकडून म्हणाव्या त्या प्रमाणात जनजागृती केली जात नसल्याने तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचतच नाही. त्यामुळे गरिबी असल्याने केवळ पैसे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यात कर्जवाटप कमी झाले आहे.
पीककर्जाचे काम संथ गतीने!
By admin | Updated: June 29, 2016 23:59 IST