मंडणगड : तालुक्यातील ग्राहकांवर वीज करांचा वाढलेला अधिभार, शेतीपंप वीज जोडणी अभावी सर्वसामान्य शेतकऱ्याची झालेली गैरसोय, वाढती महागाई, रेशनवरुन गायब झालेले धान्य, संगणकीकृत सातबारा मोहिमेमुळे नागरिकांच्या वाढलेल्या अडचणी अशा विविध समस्यांसंदर्भात आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने बुधवारी मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टी कार्यालयासमोरुन या मोर्चाला सुरुवात झाली. यानंतर सरकारचे विरोधात घोषणा देत मंडणगड शहरातून हा मोर्चा भिंगळोली येथील तहसील कार्यालयासमोर धडकला. यानंतर तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान वीज वितरण कंपनी अस्थापनेचे प्रमुख अभियंता तहसील कार्यालयात चर्चेसाठी वेळेवर उपस्थित न राहिल्याने मोर्चेकरी व सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा खोळंबा झाला़ दूरध्वनीवर वारंवार संपर्क केल्यानंतर सुमारे एक तासाचे विलंबाने महावितरणचे प्रमुख अधिकारी माने हे तहसील कार्यालयात हजर झाले. तालुक्यातील शेतीपंपाचे प्रलंबित वीज जोडण्यांचे समस्येवर दीर्घकाळ वादंग झाल्याने सरतेशेवटी एक महिन्यात सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे जुजबी आश्वासन मोर्चेकऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा समाप्त झाला. राष्ट्रवादीच्या या मोर्चाला जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, प्रकाश शिगवण, खेड तालुकाध्यक्ष स. तु. कदम, भाई पोस्टुरे, रमेश दळवी, मनोज घागरुम, सुरेश मोरे, अनिल रटाटे, वैभव कोकाटे, राकेश साळुंखे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी) आघाडीतील घटक पक्षांची मोर्चाला अनुपस्थिती विविध मागण्यांसाठी मंडणगड येथे काढण्यात आलेला मोर्चा हा राष्ट्रवादी, काँग्रेस व रिपाइं या महाआघाडीचे माध्यमातून आयोजित करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्यावतीने मंगळवारी स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज मोर्चात महाआघाडीतील काँग्रेस आय व रिपाइं या घटक पक्षांची अनुपस्थिती जाणवली. या संदर्भात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत मोर्चाचा विषय हा आघाडीतील घटकपक्षांसमोर संयुक्तपणे बोर्डावर ठेवण्यात आलेला नव्हता, हा विषय आमच्यासमोर आयत्यावेळी ठेवण्यात आला असल्याचा खुलासा केला़ रिपाइंची या विषया संदर्भातील अधिकृत प्रतिक्रिया कळलेली नाही़ नाराज तालुकाध्यक्ष राहिले अनुपस्थित गेले कित्येक दिवस सक्रीय राजकारणापासून दूर असेलेली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुलतान मुकादम जनतेच्या प्रश्नासाठी आयोजित केलेल्या मोर्चासही अनुपस्थित राहिल्याने विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले असून, पक्षाचे कार्यपध्दतीवर ते नाराज असल्याचे बोलले जात आहे़
राष्ट्रवादीचा मोर्चा
By admin | Updated: November 19, 2015 00:42 IST