रत्नागिरी : महावितरणपुढे थकबाकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ५६४ ग्राहकांनी अद्याप वीजबिल न भरल्यामुळे ४८ कोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
कोरोना काळात तीन महिने वीजबिले न देता एकत्रित तीन महिन्यांची बिले देण्यात आली होती. मात्र, ग्राहकांकडून मोठ्या रकमेची वीजबिले असल्याने भरली गेली नाहीत. त्यातच सरकारकडून वीजबिल माफीचे आश्वासन देण्यात आले होते. वीजबिल माफ होईल, या आशेने ग्राहकांनीही वीजबिले न भरल्यामुळे महावितरणपुढे थकबाकीचा डोंगर उभा राहिल्याने वसुलीचे आव्हान उभे ठाकले.
रत्नागिरी जिल्ह्यातील ९८,९७२ घरगुती ग्राहकांकडे २० कोटी ४० लाख, वाणिज्यिक ९,९३९ ग्राहकांकडे ८ कोटी १९ लाख, औद्योगिकच्या १,३२५ ग्राहकांकडे ५ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी आहे. उच्चदाब व पाणीपुरवठा योजना इत्यादी मिळून जिल्ह्यातील तब्बल १ लाख २२ हजार ५९४ थकबाकीदारांकडे ४८ कोटी ५४ लाख ७४ हजार रूपयांची थकबाकी आहे.
रत्नागिरी विभागातील ५७,८३५ ग्राहकांकडे २२ कोटी ३५ लाख ९५ हजार, चिपळूण विभागातील ३३,११० ग्राहकांकडे १४ कोटी २२ लाख १३ हजार, खेड विभागातील ३१,६१९ ग्राहकांकडे ११ कोटी ९६ लाख ६७ हजार रूपयांची थकबाकी आहे.
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी गेले असता काही ग्राहकांकडून थोडीफार रक्कम देऊन वीज पुरवठा खंडित न करण्याची विनंती करण्यात येते. परंतु थकबाकीची पूर्ण रक्कम वसूल न झाल्याने थकबाकीचा डोंगर वाढतच आहे. ग्राहकांना वीजबिले भण्यासाठी महावितरणकडून टप्प्याटप्प्याने सवलत देण्यात आली आहे. ऑनलाईनही सुविधा उपलब्ध केली होती, मात्र, ग्राहकांडून थकीत रकमेच्या तुलनेत किरकोळ रकमेचाच भरणा करण्यात येत असल्याने ऑनलाईन सवलत बंद करण्यात आली आहे. ग्राहकांना उपविभागीय कार्यालयात थकीत रकमेचे टप्पे आखून देण्यात येत आहेत. त्यानुसारच ग्राहकांनी थकीत रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.