मेहरुन नाकाडे, रत्नागिरी बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:ला पदवीधर होता आले नाही, याची खंत उराशी बाळगत, अविरत कष्ट करून परिस्थितीशी सतत झगडत, तिन्ही मुलींना उच्चशिक्षित करण्यासाठी एका मातेची चालू असलेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे. संजना गजानन पाष्टे इमारतीच्या सुरक्षारक्षकाची जबाबदारी सांभाळतात. फावल्या वेळात कोणाची धुणीभांडी करतात, तर कोणाच्या पोळ्या लाटण्याचे काम करतात. मुलींच्या शिक्षणाची जिद्द त्यांना जणू स्वस्थ बसू देत नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गेली चौदा वर्षे म्हणजे एक तप त्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाची जबाबदारी सांभाळत आहेत. पगार तुटपुंजा असला, तरी सोसायटीकडून राहायला मिळालेली छोटेखानी खोली, पाणी व विजेची मोफत व्यवस्था यामुळे त्या समाधानी आहेत. शहरात राहायचे म्हटले तर घरभाडे, वीजबिल, पाणीबिलासाठी पैसे मोजावे लागतात. परंतु, सोसायटीकडून ही व्यवस्था होत असल्याने त्या छोट्याशा संसारात समाधानी आहेत. नवरा कंत्राटी नोकरी करीत असल्याने तीही मिळकत अपुरी पडते. संजना यांचा दिवस पहाटे सुरू होतो. मुलींचा व नवऱ्याचा डबा तयार करून, घरातले आवरून लगतच्या दोन इमारतींची कामे पूर्ण करतात. मुले शाळेत गेल्यावर, त्या कोणाची धुणी भांडी किंवा फरशी पुसण्याची कामे आवरून पोळ्या लाटण्यास जातात. सायंकाळी घरी आल्यावर एका बाजूला स्वयंपाक आटोपून, मुलींचा अभ्यास स्वत: घेतात. दिवसभर काम करूनसुध्दा त्यांच्या चेहऱ्यावर कामाचा ताण कधीच नसतो. मुलींनी शिकावे, उच्चशिक्षित व्हावे, अशी मनिषा उराशी बाळगून त्यांची वाटचाल सुरू आहे. सुरूवातीला इवल्याशा खोलीमध्ये राहणाऱ्या संजना यांच्या कुटंबियांना सोसायटीने स्वखर्चाने दहा बाय दहाची खोली वजा पत्र्याची शेड बांधून दिली आहे. या रूममध्ये त्यांचा संसार सुरू आहे. संजना यांची माहेरची परिस्थितीदेखील बेताची असल्याने त्यांचे शिक्षण बारावी विज्ञानपर्यंत झाले. त्यानंतर, मिळेल ते काम करत राहिल्या. मोठी मुलगी ऋतुजा नववीत, मधली सिध्दी पाचवीत तर धाकटी ऋची इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहेत. मुलीही हुशार असल्याचा संजना यांना अभिमान आहे. त्या नेहमीच प्रथम श्रेणीत असतात, त्यांच्यावर मी कोणतीच इच्छा लादणार नसल्याचे, नम्रमणे सांगून त्यांनी शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे राहावे, इतकीच आपली इच्छा आहे. त्यासाठी मी कितीही कष्ट सोसण्यास तयार आहे. सोसायटीतील सर्व कुटूंबांचेही मला सहकार्य लाभते, किंबहुना त्यांचे मनोधैर्य मला बळ देऊन जाते. नुकत्याच त्या मोठ्या आजारातून बाहेर आल्या आहेत. मुली लहान असल्यामुळे, त्यांनाही वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मुली शाळेत असेपर्यंत, कामे पूर्ण करून मुली शाळेतून घरी परत येईपर्यंत घरी परतात. मुलींना शिष्यवृत्ती, एमटीएस, स्पर्धा परीक्षांना त्या बसविण्यास प्रवृत्त करतात. त्यासाठी जादा अभ्यासवर्ग अद्याप लावलेला नाही. मधलीची शिष्यवृत्ती चार गुणांसाठी हुकली, याची खंत आहे. परंतु त्याचे दु:ख न करता, सतत अभ्यास करावा, असे त्यांना वाटते. पुढील वर्षी मोठी मुलगी दहावीला असेल. त्यामुळे आतापासून चिंता लागून राहिली आहे.
मुलींच्या उज्ज्वल भविष्याच्या ‘स्वप्नां’ना आईच्या कष्टाचं कोंदण
By admin | Updated: February 1, 2015 00:50 IST