राजापूर : राज्याच्या कठीण आर्थिक स्थितीत कोकणात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुले समर्थन दिलेले असतानाच आता मुंबईस्थित तालुकावासीय आणि मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी प्रकल्पासाठी राजापूरवासीयांना आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवनावरच प्रचंड मोर्चा काढण्यासाठी एकत्र या, असे आवाहन त्यांनी तालुक्यातील सर्वपक्षीयांना केले आहे.
काही महिन्यांपूर्वी तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठी जे राजकीय पक्ष एनजीओंच्या प्रभावामुळे विरोध करत होते, त्यापैकी शिवसेना वगळून इतर सर्वच राजकीय पक्ष आता रिफायनरीचे समर्थन करत आहेत. तर नाणार परिसरातील अनेक गावांमधून आता या रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर समर्थन वाढत आहे. या भागातील सुमारे दीड हजार कुटुंबांनी आपल्या जमिनी स्वखुशीने या प्रकल्पाला देण्यासाठीची संमतीपत्र दिलेली आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे १४ हजार एकर जमिनीची नाणार परिसरात गरज असून, त्यापैकी सुमारे साडेआठ हजार एकरची संमतीपत्र येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेली आहेत. त्यामुळे आता या प्रकल्पाला विरोध राहिलेला नाही. त्यामुळे शासनाने आता हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
नाणार येथे रिफायनरी प्रकल्प करण्यास आता फक्त शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे तालुक्यामधून आता हा प्रकल्प बारसू सोलगाव परिसरात उभारावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याठिकाणी सर्वांनीच समर्थन दिलेले आहे. तरीही राज्य सरकार या प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याने व त्यातच या प्रकल्पाची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन विदर्भात केलेली आहे. कोकणात या प्रकल्पाची नितांत गरज असून, हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशन काळात विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी केले आहे.