रत्नागिरी : पेपरमिल, रिफायनरी उद्योग आणि मेरिटाईम युनिव्हर्सिटी रत्नागिरीतच राहावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या दक्षता समितीच्या बैठकीसाठी आज ते रत्नागिरीत आले असता, त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.ते म्हणाले की, पेपरमिल लोटे परशुराम येथे आणण्याचा आपला प्रयत्न आहे. कालावधी वाढल्याने याचा खर्च आता ३०० कोटींवरून ४०० कोटींवर गेल्याने आता हा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आले आहे. सरकारी पेपर मिलबरोबरच खासगी पेपरमिल आणण्याचाही आपला प्रयत्न आहे.मेरिटाईम युनिव्हर्सिटीही रत्नागिरीत आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा दापोलीत उपलब्ध असल्याने हे विद्यापीठ दापोलीत (उसगाव) येथे व्हावे, असे आपल्याला वाटते. यासाठी केंद्राकडून ५० कोटी निधी उपलब्ध आहे. मात्र, जयगडमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीने यासाठी २५ एकर जागा दिल्याने जयगडमध्ये हे विद्यापीठ होण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.तवसाळ - पडवे (ता. गुहागर) येथे रिफायनरी उद्योगासाठीही केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्याने ६० दशलक्ष टनाचा हा उद्योगही रत्नागिरीत येणार आहे. यात भारत पेट्रोलिअम, इंडियन आॅईल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान लिव्हर या तीन कंपन्यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या दक्षता समिती बैठकीत त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सर्व योजना जिल्ह््यात चांगल्याप्रकारे राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना २ वर्षे ठप्प होती. पण आता ती सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेची ५३३ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यासाठी आवश्यक ३८ कोटी रूपये केंद्राकडून उपलब्ध करून दिले जातील. डिसेंबरअखेर ८८ किलोमीटरची कामे १०० टक्के कामे पूर्ण होतील. यावेळी खासदार विनायक राऊत उपस्थित होते. ते म्हणाले की, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील निधीचा योग्य विनीयोग होत असल्याने साथीच्या आजारांना पायबंद बसला आहे. शासकीय जिल्हा रूग्णालयाचे नव्याने केलेले बांधकाम पडत आले आहे. याबाबत आपण आरोग्य संचालकांशी चर्चा केली असून, याबाबत लवकरच कार्यवाही होणार आहे. लवकरच रिक्त पदांबाबत तसेच तेथील आरोग्य सेवेच्या कमतरतेबाबत पूर्तता होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)वीज ग्राहकांसाठी योजनामहावितरणच्या संदर्भात तक्रारी वाढत्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना चांंगली सेवा मिळावी यासाठी केंद्राच्या शहरी भागासाठी आयपीडीएस आणि ग्रामीण भागासाठी दिनदयाळ ग्रामज्योती योजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी अनुक्रमे ३८ कोटी आणि ५६ कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड अशा पाच शहरांमध्ये ट्रान्समिशन सेंटर उभारण्यात येणार आहेत. यासाठी ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री म्हणाले...आशांचे मानधन वाढवून ते दरमहा ५००० रूपये करावे, असा ठराव आजच्या आढावा बैठकीत झाला.तळे, रामपूर, साखरपा या तीन ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे उभारणार तसेच जिल्ह््यातील पाच आरोग्य केंद्राचे नुतनीकरण करणार. रिक्त पदे भरण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून, आजच्या बैठकीत तसा ठराव करण्यात आला.केंद्र सरकारच्या दोन योजनांसाठी महावितरणला १०० कोटी देण्यात येणार आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठीही दक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह््यातील १७ धनगरवाड्यांवर अजूनही वीज पोहोचलेली नाही. तिथे सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरविणार आहोत.बैठकांना विविध विभागांचे अधिकारी उशिरा येतात. याबाबतही आपण सक्त सूचना दिल्या आहेत.
मेरिटाईम युनिव्हर्सिटी रत्नागिरीतच : गीते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:53 IST