रत्नागिरी : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे पूर्ण झाली असतानासुद्धा आजपर्यंत तमाम गोरगरीब जनतेला मुलभूत हक्क प्राप्त झालेले नाहीत. याचे कारण देशातील सर्व विखुरलेल्या जनतेला एकत्र करुन मुलभूत अधिकारासाठी लढा देणारी एकही संघटना किंवा संस्था कार्यरत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय निवारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष एम. के. पवार यांनी व्यक्त केले. रत्नागिरीत घर हक्क परिषदेच्यावेळी ते बोलत होते.गोरगरीब जनतेला मुलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय निवारा परिषद या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. डी. गायकवाड आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश जगताप व सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस निस्वार्थपणे जनतेला एकत्र व संघटीत करुन त्यांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेचे कोकण विभाग प्रमुख एम. के. पवार यांनी रत्नागिरी येथे घरहक्क परिषद सोहळा आयोजित केला होता.कार्यक्रमाला राष्ट्रीय निवारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. डी. गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद जगताप, महाराष्ट्र उपसचिव परेश पाटील, सतीश आयरे, कोकण विभागप्रमुख एम. के. पवार तसेच स्थानिक कार्यकर्ते श्रृती आयरे, संजय कांबळे त्याचप्रमाणे शिक्षण समितीचे संचालक साळुंखे, नितीन तळेकर, मंदार पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गरीब जनता हक्कापासून वंचित
By admin | Updated: October 15, 2015 00:46 IST