रत्नागिरी : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे राज्यातील एक हजार शाळांमध्ये ५० हजार विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण देण्यात येणार आहे. रत्नागिरीतही गेली तीन वर्षे चेसमन संघटनेतर्फे हा उपक्रम सुरु असून, आतापर्यंत ४०० विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार असून, त्यासाठी प्रशिक्षकाची आवश्यकता असल्याची माहिती चेस इन स्कूलचे जिल्हा संघटक चैतन्य भिडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.बुद्धिबळ शिकण्याचे व खेळण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषत: लहान वयात हा खेळ गिरविल्यास मुलांना संयम, एकाग्रता, निर्णयक्षमता वाढवण्याबरोबर चुकलेल्या निर्णयाची स्वत: जबाबदारी स्वीकारण्याची जाणीव विकसित होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय कल्पनाशक्ती, लढण्याची जिद्द, स्वतंत्र विचार करण्याची सवय आदी अनेक गुण विकसित केले जाऊ शकतात. चेसमन इन स्कूल या प्रकल्पामध्ये गेल्यावर्षी राज्यातील २३५ शाळांचे १२ हजार ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये एक हजार शाळांमध्ये जाऊन ५० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रथम तीन वर्षे चेस इन स्कूलची वाटचाल ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावर्षीपासून सांगलीचे गिरीष चितळे यांनी चेस इन स्कूलच्या कमिशनर पदाची धुरा सांभाळली आहे.यावेळी चेसमनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर, दिलीप टिकेकर, मंगेश मोडक, विवेक सोहनी, राधा देवळे, सौरभ देवळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘चेस इन स्कूल’चा उपक्रम
By admin | Updated: December 25, 2015 00:39 IST