रत्नागिरी : रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पावणेदोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २०२१ -२२ या सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, त्यासाठी ए. एस. आय. पी.ची मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षापासून ५ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार असून, यात मेकाट्रोनिक्स या नव्या अभ्यासक्रमाचा पहिल्यांदाच समावेश आहे. या प्रत्येक अभ्यासक्रमाची क्षमता ६० असेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत नूतन जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोविडचे प्रमाण कमी होत आहे, नवीन जिल्हाधिकारी यांनी एक महिन्यात दुसरी लाट संपविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केल्याचे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले. तौक्ते वादळातील बाधितांसाठी २१ कोटी २५ लाख ६० हजार प्राप्त झाले असून, त्यापैकी ७ कोटी ६० लाख रुपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे. यापैकी घरांसाठी ३ कोटी १ लाख, तसेच ५ कोटी ६० लाख, दोन मृतांच्या वारसांसाठी ८ लाख, मत्स्य विभागासाठी ११ लाख आदींचे वाटप झाले आहे.
दहावीचा १०० टक्के निकाल लागला आहे. कोरोनामुळे परीक्षा झाल्या नसल्या तरी मार्क्सचे स्ट्रक्चर योग्य आहे. कोकणच्या विद्धवतेची शान कोकणातील मुलांनी दाखवून दिल्याचे सांगत सामंत यांनी या मुलांचे कौतुक केले. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यातील काही परिचारिका पगार न मिळाल्याने काम सोडून गेल्या आहेत. याबाबत, सामंत यांनी यापैकी ६२ परिचारिकांचे पगार ताबडतोब द्यायला सांगितले असल्याची माहिती दिली.
- मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील १५ हजार तरुण, तरुणींचे लसीकरण करणार.
- चिपळूण येथील रिकामा ऑक्सिजन सिलिंडरप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना नोटीस देण्याऐवजी कारवाई करण्यास सांगितले.
- आरोग्य क्षेत्रातील भरती कोरोनामुळे थांबली आहे. आता ती चक्राकार पद्धतीने सुरू होणार असून, त्याची सुरूवात रत्नागिरी - सिंधुदुर्गातून सुरू आहे.
- मुंबई - गोवा महामार्गासाठी केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलनात उतरणार.