सेवामुक्त लिपिक-टंकलेखक विलास देशमुख यांना २१ डिसेंबर २०२१ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ४.२ नुसार अधिसंख्य पदाचे आदेश मिळावे या व इतर मागण्यांसाठी आफ्रोह रत्नागिरी शाखेने ५ जुलैपासून साखळी उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दिवशी आफ्रोहच्या शिष्टमंडळांनी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना निवेदन देऊन देशमुख यांच्या अधिसंख्य पदाबाबत चर्चा केली होती. २५ सप्टेंबर २०२० ला याबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे मार्गदर्शन मागितल्याचा मुद्दा पुढे करून अद्यापही मार्गदर्शन आले नाही, असे त्यांनी सांगितले होते. इकडे अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने देशमुख यांचे आफ्रोहच्या माध्यमातून उपोषण सुरूच होते. उपोषणाच्या दहाव्या दिवशीही मुसळधार पावसातही आफ्रोहचे उपोषण सुरूच होते.
दरम्यान सांगली, ठाण्यासह पुण्यातील आफ्रोहच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ रत्नागिरीत धाव घेतली. दहा दिवस उपोषणाची दखल न घेतल्यामुळे आफ्रोहच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त भावना उमटली. मंत्रालयाच्या महसूल विभागातून ८ जानेवारी, २९ जानेवारी आणि ७ जुलैला विलास देशमुखांच्या अधिसंख्य पदाच्या आदेश देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचित केल्याचे पत्र प्राप्त झाले होते. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणतीच कार्यवाही केली नव्हती.
अखेर उपोषणाच्या दहाव्या दिवशी आफ्रोहचे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, नरेंद्र हेडाऊ, पुणे आफ्रोहचे सचिव अभय जगताप, उदाराम लिखार यांनी पोलीस विभागाच्या मध्यस्थीने पुन्हा निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्याशी चर्चा केली. या सर्व शासन पत्रानुसार देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश देणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. भडकवाड यांनी अव्वल कारकून अमर घोसाळकर यांना हे मुद्दे लक्षात घेऊन तात्काळ टिप्पणी ठेवण्याची सूचना केली व अधिसंख्य पदाचे आदेश देण्याबाबत मान्य केल्याचे आश्वासन दिल्यामुळे आफ्रोहने व विलास देशमुख कुटुबीयांचे दहा दिवसांचे साखळी उपोषण स्थगित केल्याचे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते व जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी जाहीर केले.
यावेळी विलास देशमुख यांच्यासह नरेंद्र हेडावू, मंगला रोडे, प्रतिभा रोडे किशोर रोडे, पंडित सोनवणे, राजेश सनगाळे, निकिता व सुनंदा देशमुख, शीला देशमुख उपस्थित होते.
फोटो मजकूर
निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर साखळी उपोषण मागे घेण्यासंदर्भात त्यांना निवेदन देताना आफ्रोहचे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, पुणे आफ्रोहचे सचिव अभय जगताप, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, किशोर रोडे आदी उपस्थित होते.