रत्नागिरी : हातखंबा (ता. रत्नागिरी) येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्थेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हातखंबा तिठा ते मारुती मंदिरदरम्यान मुख्य मार्गावरील सर्व सार्वजनिक ठिकाणे व प्रवासी शेड यांचे मोफत निर्जंतुकीकरण मोहीम राबविली.
सध्या कोरोना संकटकाळात प्रत्येकजण आपापल्यापरीने समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेने काम करीत आहे. कोरोना व लॉकडाऊनच्या कठीण काळात माहेर संस्थेनेही आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले आहे. गोरगरीब, गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे वाटप, गरजू रुग्णांना ॲम्ब्युलन्सची सुविधा त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणे व प्रवासी शेड अशा गर्दीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे असल्याने माहेर संस्थेने हातखंबा तिठा ते मारुती मंदिरपर्यंत रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणे व प्रवासी शेडचे निर्जंतुकीकरण केले.
हे निर्जंतुकीकरण करण्याचे काम संस्थेचे कार्यकर्ते आशिष मुळे, अमित येलवे व संस्थेचे अधीक्षक, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी माहेर संस्थेच्या संस्थापिका संचालिका सिस्टर ल्युसी कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
संस्थेने समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाबद्दल या संस्थेला धन्यवाद देण्यात आले.
या बातमीला १० रोजीच्या शोभना फोल्डरला माहेर नावाने फोटो आहे.
फोटो मजकूर
रत्नागिरीनजीकच्या हातखंबा येथील माहेर संस्थेतर्फे सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली.