पदभरतीची मागणी
रत्नागिरी : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंत्याची पदे रिक्त आहेत. अनेकजण सेवानिवृत्त झाल्यामुळे पदे रिक्त असून त्यावर पदभरतीच झालेली नाही. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या अभियंत्यावर कामाचा ताण वाढला आहे. तातडीने या जागा भरण्याची मागणी करण्यात येत आहे.
विजेचे खांब धोकादायक
गुहागर : तालुक्यात ३९ जिल्हा परिषद शाळांजवळ महावितरणचे खांब गंजले असून, धोकादायक बनले आहेत. पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गंजलेले खांब पडण्याचा धोका आहे. तातडीने खांब हलविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. वेळेवर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
समितीला मुदतवाढ
रत्नागिरी : मागासवर्गीयांची पदोन्नती सरळ सेवेमध्ये प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासकीय सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दिलासा प्राप्त झाला आहे.
ऑनलाईन मार्गदर्शन
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जिल्हा परिषद कृषी विभाग, रत्नागिरी व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत खरीप हंगामातील भातपीक लागवड ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी मार्गदर्शन केले.