आवाशी : जलप्रदूषणाच्या कारणावरून सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर (सीईटीपी) निष्क्रियतेचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत खळबळ उडाली आहे. २००२ साली सुरू झालेल्या या प्रकल्पाविरुद्ध प्रथमच प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.लोटे परशुराम (ता. खेड) या रासायनिक औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कारखान्यांच्या स्थापनेपासूनच जल-वायू प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. सुरुवातीच्या काळात कमी कारखानदारी असल्याने त्याचे स्वरूप लहान होते. मागाहून वाढलेल्या कारखानदारांचे सांडपाणी प्रक्रिया करून सोडण्यासाठी २००२ मध्ये सीईटीपीची स्थापना करण्यात आली. हा प्रकल्प जरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा असला तरी त्यावर येथीलच उद्योजकांचे मंडळ काम पाहू लागले. तेव्हापासूनच जल-वायू प्रदूषणात वाढ झाली. सातत्याने मासे मरतूक होणे, शेती, फळबागांना धोका पोहोचणे, वायू प्रदूषणाने आरोग्य धोक्यात येणे या घटना घडू लागल्या. याची दखल घेत मुंबई येथील एक सामाजिक संस्था निकोलास आलमेडा यांनी २०१० मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांपासून मेंबर आॅफ सेक्रेटरीपर्यंत सर्वांना न्यायालयाने चौकशीसाठी बोलावणे सुरू केले. ही प्रक्रिया २०१५ पर्यंत सुरूच राहिली. अखेर आम्ही हा प्रकल्प चालवित नसून, तेथील स्थानिक उद्योजकांचे मंडळ त्याचा कारभार सांभाळतात, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगून सीईटीपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीईटीपीचे विद्यमान अध्यक्ष सतीश वाघ, उपाध्यक्ष डी. के. शेणाय, संचालक मिलिंद बापट, मिलिंद बारटक्के, राजेश तिवारी, विश्वास खाडीलकर, सुचेता लाड, अंजली ओगले, सुशील कांबळे, प्रशांत जोशी, गौतम मखारिया या संचालकांसह सीईटीपी व्यवस्थापक शरद फौजदार यांना खेडच्या दिवाणी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स न्यायालयाकडून जारी करण्यात आले आहे. यापैकी फौजदार हे न्यायालयात हजर झाले असून, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, एकही संचालक अजून हजर झालेला नसल्याचे समजते. याबाबत लोटे पोलिसांकडे संपर्क साधला असता आम्ही केवळ आलेले समन्स बजावले असून, इतर कोणतीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. संचालक मंडळापैकी मिलिंद बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, जल प्रदूषणाचा मुद्दा त्याचबरोबर मागील तीन वर्षांपासून सीईटीपीचे रखडलेले विस्तारीकरण व अन्य बाबींचा ठपका ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सीईटीपीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजनही केले आहे. उर्वरित बाबींबद्दल आम्ही आमचे म्हणणे न्यायालयासमोर मांडू. बापट यांच्यासह अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. लोटेसह तारापूर, रोहा, सोलापूर व कुरकुंब येथील सीईटीपीवरही गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. (वार्ताहर)\संचालकांचे राजीनामे?या घटनेनंतर सीईटीपी लोटेच्या बहुतांश संचालकांनी तत्काळ राजीनामा दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दोन दिवसांपूर्वी सोनपात्रा नदीत मासे मृत झाल्याच्या घटनेला व संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाल्याच्या घटनेला काही अवधी लोटतो न लोटतो तोच मंगळवारी सायंकाळी पुन्हा कोतवली नदीत मासे मृत झाल्याचे वृत्त तेथील ग्रामस्थांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. तलाठ्यांनी त्याचा पंचनामा केल्याचेही सांगितले.
जलप्रदूषणावरून लोटे सीईटीपीवर गुन्हा
By admin | Updated: June 23, 2016 01:10 IST