राजापूर : तालुक्यातील पेंडखळे गाव हॉटस्पॉट बनताना याठिकाणी गेल्या दोन दिवसांत अँटिजन टेस्टमध्ये तब्बल २२ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. गेल्या चार दिवसांत तालुक्यात कोरोनाने कहर केल्याचे स्पष्ट झालेले असताना एकूण रुग्णांची संख्या तब्बल ७६५ वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ४६५ आहे. मृत्यूच्या संख्येतही पाचने वाढ होत आता ही संख्या ३० झाली आहे. मृतांमध्ये चार रुग्ण करक, तर एका पेंडखळेतील रुग्णाचा समावेश आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी आलेल्या ३४० कामगारांची बुधवारी अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्येही ३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने त्यांना होम आयसोलेट करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत राजापूर शहरासह तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. दोन दिवसांतच तब्बल ९६ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यामध्ये पेंडखळे येथीलच २२ रुग्णांचा समावेश आहे. पेंडखळे हॉटस्पॉट बनल्याने त्याठिकाणी प्रतिदिन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक भेट देत असून, स्थितीवर लक्ष ठेवून आहे. राजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी २८ जणांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये आठ पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत तालुक्यातील कोरोना मृतांचा आकडा २५ एवढा होता. मात्र, तीन ते चार दिवसांत पाच नवे मृत्यू झाल्याने हा आकडा आता २५ झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सेफ झोन म्हणून गणला गेलेला राजापूर तालुका दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाग्रस्त झालेला दिसत आहे. तालुक्याच्या चोहोबाजूने रुग्ण निष्पन्न होत असल्याने आरोग्य विभागदेखील सतर्क झाला आहे.
......................................
निखिल परांजपे नवे तालुका वैद्यकीय अधिकारी
राजापूर तालुक्यातील धारतळे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांच्याकडे सध्या तालुका आरोग्य अधिकारी म्हणून तात्पुरता पदभार सोपवण्यात आला आहे. डॉ. परांजपे हे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून गणले जातात. त्यांच्या नियुक्तीने कोरोना प्रादुर्भावाच्या कठीण काळात आरोग्य विभागाच्या कारभाराला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.