गुहागर : तालुक्यात अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या आंबा नुकसानासाठी भरपाई म्हणून ३ हजार ८८६ शेतकऱ्यांसाठी आलेल्या १ कोटी रुपयांच्या निधीमधून ६५२ शेतकऱ्यांना ९९ लाख रुपयांचा निधी वाटप केला असल्याची माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली.गुहागर तालुक्यात ३ हजार ८८६ सातबारे असून, त्यावर १९ हजार ५२७ शेतकऱ्यांची नावे आहेत. यासाठी हेक्टरी २५ हजार भरपाईचा निकष असून, दोन एकरपर्यंत ५० हजार एवढी कमीत कमी नुकसानभरपाई मिळणार आहे शासनाकडून आलेला निधी जूनमध्ये तालुक्याला प्राप्त झाला असला तरी हा निधी कोणत्या निकषाद्वारे वाटप करायचा, हे धोरण निश्चित नसल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर ६५२ शेतकऱ्यांना ९९ लाखांचा निधी वाटप करण्यात आला.प्राथमिक टप्प्यात सातबारा उताऱ्यावर एकमेव नाव असलेल्या शेतकऱ्यांना हा निधी वाटप करण्यात येत आहे. उर्वरित सातबारा उताऱ्यांवर एकापेक्षा जास्त नावे आहेत, तसेच यामधील अनेक व्यक्ती बाहेरगावी असल्याने हा निधी वाटप होण्यामध्ये अडचणी आहेत.याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सातबारा उताऱ्यांवरील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकाला समान निधी देण्यात येणार आहे. अन्यथा कोणा एकाला संमत्तीपत्राद्वारे मंजुरी दिल्यास त्या व्यक्तीच्या नावे निधी जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्र पूर्ण करुन निधी ताब्यात घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
भरपाई तब्बल दोन महिन्यांनी
By admin | Updated: August 26, 2015 22:47 IST