रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेकडो लोकांना पैसे दामदुप्पट करून देतो, असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘सॅफरॉन’ कंपनीच्या रश्मी सुरज मांडवकर व ऐश्वर्या विजय गावकर या दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी दिनार भिंगार्डे यांनी गुन्हा दाखल केला होता. सॅफरॉन इंटरनॅशनल हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गेल्या चार ते पाच वर्षांत रत्नागिरी येथे आपले बस्तान चांगलेच बसविले होते. परदेशी टूरच्या आडून अनेकांना विविध आकर्षक गुंतवणूक योजनांकडे वळवत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत कंपनीचा मालक शशिकांत राणे हा गायब होता. तसेच रत्नागिरीतील आरोग्य मंदिर येथील कार्यालही बंद झाले होते. मध्यंतरी काही लोकांनी संतापाने या कार्यालयाचा फलक फोडला होता. फसवणूक झालेल्यांचा तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न असफल झाला होता. मात्र, दिनार भिंगार्डे यांनी अखेर गुरुवारी १९ लाखांवर रक्कम भरूनही ती परत न मिळाल्याची तक्रार दिल्यानंतर शशिकांत राणे, रश्मी मांडवकर तसेच ऐश्वर्या गावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी तीन दिवसांपूर्वीच शशिकांत राणे याला मुलुंंड पोलिसांनी अटक केली आहे. आज, शुक्रवारी रत्नागिरीत कार्यरत असलेल्या ‘सॅफरॉन’च्या दोन महिला कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींनाही २३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
फणेपूरमधील सिमेंट बंधारा फुटला
By admin | Updated: June 21, 2014 00:08 IST