प्रकाश वराडकर - रत्नागिरी -शहरात साळवी स्टॉप येथे ‘पक्षी उद्यान’, सन्मित्रनगरमध्ये ‘फुलपाखरू उद्यान’ व भगवती किल्ला परिसरात ‘थीम पार्क’ उभारण्याबाबत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पुढाकार घेतला आहे. शहरात ही उद्याने विनामोबदला उभारून पुढील पाच वर्षे या उद्यानांची देखभाल करण्याची तयारी मुंबईस्थित ‘फुलोरा फाऊंडेशन’ या संस्थेने दाखविली आहे. याबाबत शहरातील काही जागांची पाहणीही करण्यात आली असून, संस्थेला प्रकल्प अहवाल सादर करण्यास नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात ही उद्याने उभारली जातील, अशी अपेक्षा व्यक्त आहे. शहरीकरणाचा वेग वाढल्याने वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली असून, त्यामुळे पक्षीजीवन धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या क्षेत्रात कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथे पक्षी उद्यानासाठी जागा निर्माण करावी, असा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे. जलशुध्दिकरण प्रकल्पाच्य आवारातील ७ एकर जागेत सध्या ठिकठिकाणी शहरातील कचरा डंप केला जात आहे. त्यामुळे या कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्न नगरपरिषदेपुढे निर्माण झाला आहे. जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षी येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथे कचऱ्याचे सपाटीकरण करणे व त्यावर माती पसरून विशेष जागा तयार करणे शक्य आहे. त्याच जागेवर पक्षी उद्यान निर्माण करणे शक्य आहे. याबाबत फुलोरा संस्थेने गेल्याच आठवड्यात पाहणी केली असून, त्याचा प्रकल्प अहवाल येत्या काही दिवसात नगरपरिषदेला प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. पक्षी उद्यानाप्रमाणेच शहरातील सन्मित्रनगर येथील सध्या अस्तित्त्वात असलेले उद्यान फुलपाखरू उद्यान म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. फुलपाखरांच्या सौंदर्याविषयी आपल्या मनात नेहमीच कुतूहल असते. मात्र, फुलपाखरांना बागडता यावे, त्यांचे जतन व्हावे, त्यांनाही हक्काची जागा मिळावी व शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी हा या उद्यानामागील हेतू आहे. डोंबिवली येथेही असे फुलपाखरू उद्यान उभारण्यात आले आहे. त्यामुळे नवीन वर्षात रत्नागिरी शहरातही फुलपाखरू उद्यान उभारण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे. त्यासाठी पूर्वतयारी सुरु झाली आहे. तसेच भगवती किल्ला येथे असलेल्या पालिकेच्या जागेत ‘थीम पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव आहे. याठिकाणी बगिचा, झाडे लावून हा पार्क तयार करण्याचा प्रस्ताव आहे. पावसाचे पाणी अडवून ते पाणी पार्कमधील झाडांसाठी वापरले जाणार आहे. शहराच्या सौंदर्यात त्यामुळे भर पडणार आहे. सर्पउद्यान उभाण्याचीही तयारीफुलोरा फाऊंडेशनतर्फे रत्नागिरीत पक्षी, फुलपाखरू ही उद्याने उभारण्याबाबत पूर्वतयारी सुरू असतानाच रत्नागिरीत सर्प उद्यानही उभारण्यासाठी फुलोरा संस्थेला जागा उपलब्ध करून देण्याची तयारी नगरपरिषदेने दाखविली आहे. त्यासाठी जागेची उपलब्धताही करून देण्यास पालिकेची तयारी आहे. मात्र त्यावर फुलोरा संस्थेकडून प्रतिसाद मिळणे बाकी आहे. ोलहान मुलांप्रमाणे या फुला-फुलांवरून बागडणाऱ्या फुलपाखरांना त्यांची स्वत:ची जागा उपलब्ध व्हावी म्हणून सन्मित्रनगर येथे ‘फुलपाखरू उद्यान’ उभारले जाणार आहे. साळवी स्टॉपजवळील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात विविध पक्षी दिसून येत असून, तेथे या पक्ष्यांसाठी खास पक्षी उद्यान उभारण्याचा रत्नागिरी नगरपरिषदेचा प्रस्ताव आहे. भगवती किल्ला येथील भगवती मंदिर प्रसिध्द असून, मंदिराच्या पायथ्यापासून काही अंतरावर थीम पार्क संकल्पनेतून फुलझाडे, झाडांची लागवड होणार आहे. रत्नागिरी शहराच्या परिसरातील काही भागांमध्ये सरपटणारे प्राणी अधिक असून, त्यासाठीच शहरात सर्प उद्यान उभारण्यास नगरपरिषद उत्सुक आहे.
रत्नागिरीत होणार पक्षी, फुलपाखरू उद्यान
By admin | Updated: January 9, 2015 00:11 IST