रत्नागिरी : अनुसूचित जातीतील दहावीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी अकरावी व बारावी या दोन वर्षात प्रत्येकी एक लाख रूपयांप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना’ राबविण्यात येत आहे.
ही योजना एम. एच. सीईटी, जेईई, नीट मेडिकल यासारख्या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी असून, ज्या विद्यार्थ्यांचे पालक दारिद्र्यरेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाख पन्नास हजार रूपयांपेक्षा कमी आहे मुख्यत: हा लाभ त्याच विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. असंघटित क्षेत्रात, कंत्राटी पध्दतीने कामे करणाऱ्या पालकांना याचा लाभ दिला जाणार आहे.
सन २०२१मध्ये दहावीच्या निकालानंतर जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून बार्टी संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. तसेच संबंधित निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ‘बार्टी’मार्फत प्रपत्र पाठवून कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एसएससी, सीबीएसई, आयसीएसई बोर्डामध्ये ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील शासकीय नोकरीत आहेत, ते विद्यार्थी शिष्यवृत्तीकरिता पात्र राहणार नाहीत. ही योजना सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात व त्यापुढे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या लाभासाठी पात्र ठरणार आहेत.