लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या संकट काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कपात झाली. अर्थचक्र थांबले, उपासमारीची वेळ आली. मात्र, तरीही महागाईचा डोंब उसळलेला असून, जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर गेल्या वर्षभरात दामदुप्प्ट झाले असून, कोरोनाचे संकट असतानाच, गेल्या वर्षभरात २४१ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यातच ग्राहकांना दिलासा देणारी १५० ते २०० रुपयांची सबसिडीही गेल्या वर्षभरात गायब झाल्याने सामान्य माणसाने जगायचे कसे, असा प्रश्न सतावू लागला आहे.
कोरोनामुळे बेकारीही वाढली आहे. हातातील पैसा गायब झाला आहे. मात्र, घरगुती गॅसच्या वाढत्या दराने सामान्यांचे जगणे अवघड केले आहे.
शहरात चूलही पेटविता येत नाही
कोरोनामुळे पगार कपात झाल्याने आहे, त्याच खर्चात भागवावे लागत आहे. असे असताना आता घरगुती गॅसही महागला आहे. शहरात फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना आता चुलीचा आधारही घेता येत नाही. या महागाईने त्रस्त केले आहे.
- आशालता चन्ने, गृहिणी, रत्नागिरी
सरकारने सर्वच गोष्टींची महागाई वाढवली आहे. त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. कोरोनाने आर्थिक गणित कोलमडले असतानाच, आता घरगुती गॅसचे दरही भरमसाठ वाढू लागले आहेत. आता त्यावरील सबसिडीही बंद झाली आहे.
- क्षमा सावंत, गृहिणी, रत्नागिरी