वैभव गायकर
लोकमत न्युज नेटवर्क पनवेल:दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी विमानतळ प्रकल्पग्रस्त व बाधित शेतकऱ्यांनी पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील डोंगरावर दि.17 रोजी मानवी साखळी उभारून विमानतळाला दिबांचे नाव देण्याची मागणी केली.
विमानतळ प्रकल्पासाठी जमीन देऊनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आजवर अन्याय होत आहे. बीव्हीजी, ओसीएस आणि अदानी यांसारख्या प्रायव्हेट कंपन्या शेतकऱ्यांच्या हक्कांकडे सतत दुर्लक्ष करून जबाबदारीपासून पळ काढत आहेत. या अन्यायाविरोधात प्रकल्पग्रस्तांनी प्रतीकात्मक निषेध यावेळी नोंदवला. सिडकोकडे अद्याप अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, ही मागणीही विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी स्पष्ट केली. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विमानतळ कंपन्यांमध्ये शेअर्स कबूल केलेले असूनही अकरा वर्षांनंतर आजतागायत ते शेअर्स देण्यात आलेले नसल्याचा आरोप विक्रांत घरत यांनी केला.
भर पावसात प्रकल्पग्रस्त एकवटून मानवी साखळी तयार करून सिडको विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील या आंदोलनात सहभागी झाले.