महाड : छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम हिंदूंना वाचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक हिंदूने किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हायलाच हवे, असे आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी किल्ले रायगडावर केले.शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समिती, दुर्गराज रायगड, जिल्हा परिषद आणि कोकणकडा मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रायगड किल्ल्यावर तिथीनुसार शिवराज्यभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. भरत गोगावले, आ. महादेव जानकर, आ. विनायक मेटे, आ. प्रकाश सुर्वे, आ. मनोहर भोईर, आ. रूपेश म्हात्रे, बजरंग दलाचे प्रमुख राजेश पांडे, शिवरायांचे वाई येथील वंशज विजयाताई भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. कदम पुढे म्हणाले, की शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर आल्याने आपल्याला शिवकाळाचा आभास होतो, छत्रपती सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. राजमाता जिजाऊ, राणी सोयराबाई, अष्टप्रधान मंडळ बाजूला बसलेले आहे. वातावरणाचा, शिवकाळाचा भास आपल्याला झाल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी विजयाताई भोसले यांनी शिवराज्याभिषेक दिन हा तिथीप्रमाणेच साजरा व्हायला हवा, असे सांगितले. आ. भरत गोगावले, राजेश पांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सोहळ्यापूर्वी श्रीधारेश्वर महाराज आणि शंकर जंगम वृदांनी विधिवत राज्याभिषेकाचे विधी केले. यावेळी सनी तांडेल या दाम्पत्याला शिवप्रतिमेवर अभिषेक करण्याचा मान देण्यात आला. या प्रसंगी राजदरबार ते श्री जगदीश्वर मंदिर, समाधीस्थळापर्यंत ढोलताशांच्या गजरात व शिवजयघोषात शिवप्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)
रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा
By admin | Updated: June 19, 2016 04:15 IST