म्हसळा : आठवडाभरापासून म्हसळा तालुक्यात पावसाने थैमान घातले असून, शहराला जानसई नदीला पुराने वेढले आहे. म्हसळा-मुंबई मार्गावरील ढोरजे नदीवरील पुलावरून पाणी जाऊ लागले असून, वाहतूक ठप्प झाली आहे.दरम्यान, चिखलप आदिवासी वाडीवरील अशोक तुकाराम पवार यांचे राहते घर अतिवृष्टीमुळे कोसळल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. अवघ्या तीनच दिवसांपूर्वी अशोक पवार यांच्या पत्नीचे काविळीने निधन झाले होते. पावसामुळे आठवडाभर सतत वीज गायब होण्याचे प्रकार घडत असून, तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. वाडांबा, जांभूळ, नेवरूळ, पाष्टी, मोरवणे, मांदाटणे आणि तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. म्हसळा शहरात घरांचे बांधकाम नियोजनपूर्ण न झाल्याने अनेक इमारतींभोवती नदी-नाल्याचे स्वरूप आले आहे.
म्हसळ्यात पावसाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:39 IST