- संजय करडे, नांदगाव/मुरुडमुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात शेकरू या दुर्मीळ प्रजातीच्या प्राण्यांची संख्या वाढली असून ही एक समाधानकारक बाब आहे. भीमाशंकर अभयारण्यापाठोपाठ आता फणसाड अभयारण्यसुद्धा शेकरूंसाठी प्रसिद्ध होणार आहे. शेकरू म्हणजेच खारु ताईपेक्षा मोठ्या आकाराने असणारा प्राणी. फणसाड अभयारण्य हे ५३०० हेक्टर परिक्षेत्रात व्याप्त परिसर असून, रोहा व मुरुड तालुक्यांत याची व्याप्ती आहे. सुरुवातीच्या काळात या अरण्यात शेकरूंची संख्या अगदी मोजकीच म्हणजेच २५ एवढी होती; परंतु ती आता १५०वर गेली असून हा प्राणी पर्यटकांचे आकर्षण ठरत असल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी दिली.या अभयारण्यात शेकरूंची ८०० घरटी दिसून आली असून एक शेकरू स्वत:ला राहण्यासाठी किमान पाच ते सहा घरटी बनवत असतो. हा प्राणी उंच अशा झाडावर राहत असून हा फार भीत्रा, तसेच लाजाळू प्राणी आहे. चिखलगान भागात शेकरूंची संख्या जास्त असून येथे पर्यटक नेहमी गर्दी करून दुर्बीणीच्या साहय्याने न्याहाळतात. शेकरूंचे आवडते खाद्य हे गारंबीच्या शेंगातील आतला गर असून, फळे, कोवळा पाला, जांभूळ हे आहे. फणसाड अभयारण्यात शेकरूंचे जतन व संवर्धन यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती यावेळी तडवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. फणसाडमध्ये बिबट्यांची संख्या १३ आहे; परंतु यातील काही माद्यांनी पिल्ले घातली असून यातसुद्धा वृद्धी झाल्याचे तडवी यांनी सांगितले. तसेच सांबर, हरीण, भेकर, पिसोरी, रानमांजर, खवले मांजर, लंगूर माकडे आदी प्रजाती असल्याचे सांगितले. फणसाड अभयारण्याला पाणीटंचाई भासत नाही, कारण पाण्याचे नैसर्गिक २७ स्रोत आहेत. त्यामुळे वन्यजीव प्राण्यांना पाणी सतत मिळते. मे अखेरपर्यंतही पाणी असल्याने पाण्याची टंचाई भासत नाही. शिकारीचे प्रमाण या भागात शून्य टक्क्यांवर असून कायदा कडक झाल्याने हा परिणाम झाल्याचे या वेळी वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी सांगितले. कारण शिकार करताना कोणताही व्यक्ती अथवा वाहन सापडल्यास न्यायालयाकडून जामीन मिळत नाही त्यामुळे अशा व्यक्तींना बरेच दिवस तुरुं गात खितपत पडावे लागते. शिकारीचे प्रमाण शून्य असल्याचा निर्वाळा या वेळी त्यांनी दिला.फणसाड अभयारण्यात १७ गिधाडांचे वास्तव्य असून प्रत्येक ग्रामपंचायतीस कार्यालयामार्फत मृत जनावर असल्याची माहिती देऊन हे जनावर गिधाडांसाठी घेतले जाते. डॉक्टर तपासणी केल्यावर मगच हे गिधाडांना खाद्य दिले जाते. कडक उन्हाचा गिधाडांवर कोणताही परिणाम होत नाही फक्त त्यांना खाद्य मोठ्या प्रमाणावर लागत आहे. सध्या सुट्टीचा हंगाम सुरू असून फणसाडला नेहमीच गर्दी पाहावयास मिळत असून तिकिटाच्या रूपाने महसूलसुद्धा वनखात्याचा वाढत आहे.
शेकरूंच्या संख्येत वाढ
By admin | Updated: April 13, 2017 02:50 IST