अलिबाग : रायगड जिल्ह्यातील एकूण अकरा नगरपरिषदांपैकी श्रीवर्धन वगळता उर्वरित सर्व म्हणजे दहा नगरपरिषद क्षेत्रांत एकूण ४०५ इमारती कोणत्याही क्षणी कोसळून जीवितहानी होईल अशा स्थितीत आहेत. या सर्व इमारती ‘धोकादायक’ म्हणून नगरपालिका प्रशासनाने घोषित केल्या आहेत. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये या धोकादायक इमारती वा घर मानवी जीवितास धोका होवू नये म्हणून मालकांनी पाडून टाकावी वा दुरुस्त करावी अशा नोटिसा संबंधित नगरपालिकांंनी आपापल्या क्षेत्रातील धोकादायक इमारत मालकांना बजावल्या असल्याची माहिती नगरपालिकेचे जिल्हा प्रकल्प अधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली. नगरपालिका क्षेत्रातील संभाव्य धोकादायक इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करुन त्याचे अहवाल नगरपालिकेला सादर करण्याचेही इमारतीच्या मालकांना व सोसायटींच्या अध्यक्षांना कळविले. जिल्ह्यातील या धोकादायक इमारतींचे ‘लोकमत’ने केलेल्या विशेष सर्वेक्षणातून अनेक मुद्दे समोर आले आहेत. धोकादायक म्हणून घोषित ४०५ इमारती व घरांमध्ये सुमारे ६०० कुटुंबे आहेत. कर्जत नगरपालिका क्षेत्रात निष्पन्न झालेल्या एका इमारतीची सुरक्षितता पूर्णपणे बिनधोक असताना नगरपालिकेने ती इमारत धोकादायक म्हणून घोषित केली आहे. बहुतांश धोकादायक इमारतींचे मालक आणि त्यामधील भाडेकरु असा वाद न्यायालयात पोहोचला असून, तेथील निर्णय अनिर्णीत असल्याने ही कुटुंबे धोकादायक इमारतीत राहात आहेत. धोकादायक इमारतीत राहणाऱ्या काही भाडेकरुंनी न्यायालयात दाद मागून, इमारती दुरुस्ती करण्याची परवानगी आम्हाला मिळावी अशी विनंती केली असता, ती मान्य झाल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार भाडेकरुंनी आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक दुरुस्ती स्वखर्चाने करुन घेतली आहे. धोकादायक इमारती या ६० ते ७० वर्षांपूर्वींच्या असून, त्या पाडून तेथे नवी इमारत बांधल्यास, जुन्या इमारतीत राहणाऱ्या भाडेकरुंना ते राहात होते तेवढी जागा नव्या इमारतीत देणे वा नुकसान भरपाई रक्कम जुन्या भाडेकरुस देणे कायद्याने बंधनकारक आहे. धोकादायक इमारत पडल्यावरच बांधू अशी मानसिकता मालकवर्गाची तर नव्या इमारतीतील आपल्या घराचा हक्क सोडायचा नाही म्हणून त्याच धोकादायक इमारतीत राहण्याची मानसिकता भाडेकरुंची असल्याचे सर्वसाधारणपणे सर्वत्र दिसून आले. धोकादायक इमारत पडली आणि त्यात राहणाऱ्या माणसांना हानी पोहोचली तर त्यांची संपूर्ण जबाबदारी त्या इमारतीच्या मालकांची असल्याची भूमिका नगरपालिकेची आहे. याच मुद्याच्या अनुषंगाने अलिबाग येथील ‘रेणुका’ या इमारतीचा पिलर खचून ती धोकादायक झाल्याने, नगरपालिकेने त्या इमारतीच्या मालकांना नोटीस बजावल्याने मालकांनी स्वखर्चाने इमारत पाडली. 154सर्वाधिक धोकादायक इमारती व घरे माथेरानमध्ये असली तरी या इमारती व घरांना त्या घराच्या कमकुवततेचा धोका नाही तर त्यावर असणाऱ्या डोंगरांच्या दरडींचा धोका आहे. माथेरान ही नगरपालिका भौगोलिकदृष्ट्या डोंगरावर असल्याने तेथे क्षेत्र मर्यादेची मोठी समस्या आहे. 60 वर्षांपूर्वींच्या इमारती मोठ्या प्रमाणात असून त्या जीर्ण झाल्या आहेत. म्हणून ही घरे व इमारती नगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहे. जुन्या झालेल्या इमारतींची दुरुस्ती करुन काही मालमत्ताधारकांनी आपापली वास्तू तेथे सुरक्षितपणे राहण्या योग्य केली आहे.
जिल्ह्यात ४0५ इमारती धोकादायक
By admin | Updated: September 3, 2015 03:00 IST